श्रीवर्धन येथील स्मशानभूमीत पथदिव्यांचा पत्ताच नाही
। श्रीवर्धन । प्रतिनिधी ।
श्रीवर्धन पर्यटनाच्या दृष्टीने विकसित होत आहे. मात्र, येथील मूलभूत सोयीसुविधांची अभाव आजही दिसण्यात येत आहे. रात्रीच्या वेळी अंत्यसंस्कारासाठी मृतदेह स्मशानभूमीत आणला गेला. परंतु, पथदिव्यांचा पत्ता नसल्याने अंत्यसंस्कार हे भ्रमणध्वनीच्या प्रकाशझोतात करावे लागल्याची घटना घडली आहे. यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
मृत्यूनंतर आपल्या माणसाला सन्मान मिळावा, ही प्रत्येक मृत व्यक्तीचे अंतिम संस्कार करणाऱ्या नातेवाईकांची इच्छा असते. परंतु, श्रीवर्धन येथील शासकीय विश्रामगृहानजीकच्या स्मशानभूमीतील संतापजनक घटना सामोरी आली आहे. शुक्रवारी (दि.5) रात्री साडेनऊ वाजता मृतदेह अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत आणला. परंतु, पथदिवे बंद अवस्थेत असल्याने अंत्यसंस्कारासाठी आलेल्या उपस्थितांना मनस्ताप झाला.
उपस्थितांनी नगरपरिषदेत संपर्क साधला असता पथदिव्यांबाबत नकारात्मक उत्तर देण्यात आल्याने एका कुटुंबावर मृतदेहाचे अंत्यविधी भ्रमणध्वनीच्या प्रकाशझोतात करण्याची वेळ आली. एकीकडे करोडोंचे प्रकल्प राबवले जात असताना, दुसरीकडे मात्र स्मशानभूमीतील पथदिवे बंद अवस्थेत असावेत हे श्रीवर्धनचे मोठे दुर्दैव आहे.
सद्यःस्थितीमध्ये स्मशानभूमीमध्ये कन्स्ट्रक्शन काम चालू आहे. त्यामुळे काही कारणास्तव तेथील वीजपुरवठा काल रात्री खंडित झाल्याने नागरिकांना असुविधेचा सामना करावा लागला. झाल्या प्रकाराबद्दल मी श्रीवर्धनचा प्रथम नागरिक म्हणून दिलगिरी व्यक्त करतो. भविष्यात असा प्रकार होणार नाही, यासाठी नगरपालिका कटिबद्ध असेन.
– ॲड. अतुल चौगुले, नगराध्यक्ष, श्रीवर्धन





