42 विद्यार्थ्यांसाठी एकच शिक्षिका
| नागोठणे | प्रतिनिधी |
रायगड जिल्हा परिषदेच्या नागोठण्याजवळील वरवठणे येथे इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत तब्बल 42 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत असे असताना संपूर्ण शाळेसाठी केवळ एकच शिक्षिका कार्यरत असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शिक्षकांची संख्या अपुरी असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असून, शाळेत किमान दोन शिक्षक कायमस्वरूपी नियुक्त करावेत, अशी जोरदार मागणी पालक वर्गाने केली आहे.
आपल्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने वरवठणे गावातील पालक वर्ग मंगळवारी (दि.25) वरवठणे प्राथमिक शाळेत एकत्र येऊन शाळेतील वस्तुस्थिती पत्रकारांच्या निदर्शनास आणून देत प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी वरवठणेचे माजी सरपंच गणपत म्हात्रे, सामाजिक कार्यकर्ते संतोष बैकर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष भगवान राणे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा तृप्ती म्हात्रे, अश्विनी म्हात्रे, प्रणिता म्हात्रे यांच्यासह मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.
दरम्यान, वरवठणे ग्रामपंचायत सदस्य गणपत लक्ष्मण म्हात्रे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा तृप्ती म्हात्रे, प्रणिता म्हात्रे, लतिका शेडगे व निकिता वारगे यांनी रोहा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी अतुल जगताप यांची यापूर्वीच भेट घेऊन शाळेतील शिक्षकांची समस्या त्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी कायमस्वरूपी आणखी एक शिक्षक वरवठणे प्राथमिक शाळेत तातडीने उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली होती.
विशेष म्हणजे, सुमारे महिनाभरापूर्वी शाळा व्यवस्थापन समितीचे तत्कालीन अध्यक्ष संतोष बैकर यांनी तत्कालीन रोहा पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी मेघना धायगुडे यांची भेट घेऊन शाळेतील शिक्षकांच्या कमतरतेची समस्या मांडली होती. त्यावेळीही समाधानकारक निर्णय न झाल्याने पालकांची निराशा झाली होती. एकीकडे राजिप शाळांची पटसंख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याची चर्चा सुरू आहे. अनेक मान्यवरांकडून पालकांनी आपल्या पाल्यांना मराठी माध्यमातून शिक्षण द्यावे, असे आवाहन केले जाते. मात्र, वरवठणे जिल्हा परिषद शाळेसारखी परिस्थिती निर्माण होत असेल, तर पालकांनी आपल्या पाल्यांना जिल्हा परिषद शाळेत दाखल का करावे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 42 विद्यार्थ्यांसाठी केवळ एक शिक्षिका ही बाब विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या दृष्टीने गंभीर असून, प्रशासनाने 5 सप्टेंबरपर्यंत प्रतीक्षा न करता तातडीने आणखी एक शिक्षक उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी पालकवर्गातून जोर धरत आहे.
आंदोलनाचा इशारा
शाळेत लवकरात लवकर दुसरा शिक्षक नियुक्त न केल्यास आम्हाला तेव्हा पंचायत समिती कार्यालयासमोर आंदोलन व उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागेल असा इशाराही उपस्थित पालकांनी दिला आहे.
शिक्षकांची कमतरता असल्याचे कारण सांगत, येत्या 5 सप्टेंबर रोजी शिक्षक भरती झाल्यानंतर वरवठणे शाळेला आणखी एक शिक्षक देण्यात येईल.
अतुल जगताप
गटशिक्षणाधिकारी






