। धाटाव । वार्ताहर ।
पाच दिवसांच्या गणेश विसर्जनास होणार असल्याने पाऊस मात्र गणेश भक्तांची चक्क परीक्षा घेत आहे. हजारो रुपये खर्च करून तयार केलेले देखावे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामार्फत गणेश भक्तासाठी सज्ज असले तरी रोह्यात शहरासह ग्रामीण भागात विविध ठिकाणी दररोज येणार्या पावसामुळे त्यात मात्र चांगलाच व्यत्यय येत आहे.
रोहा तालुक्यात सुतारवाडी,कोलाड,खांब,धाटाव, चणेरा,यशवंतखार,घोसाळे विभागात गणेशस्थापनेच्या पहिल्या दिवसापासून पाऊस ठाण मांडून बसला आहे.दररोज दुपारपर्यंत अधून मधून विश्रांती घेणारा पाऊस सायंकाळी मात्र जोर धरत आहे. सायंकाळी जोरदार सरी कोसळत असल्याने अचानक वीज प्रवाह खंडित होण्याचे प्रकार वाढत आहेत.त्यामुळे अंधारलेले वातावरण आणखी निरुत्साहमुळे भाविकही देखावे पाहण्यासाठी बाहेर पडत नाही.परिणामी घरोघरी प्रत्येक गणेश मंडळाच्या मूर्तीचे कौतुक होत असल्याने आरास व देखावे बघण्यासाठी गणेश भक्तांची उत्सुकता ताणली गेली असताना गणरायांनी आगमन केल्यापासून दररोज सायंकाळी पाऊस झोडपून काढत असल्याने घराबाहेर पडणे देखील अवघड झाल्याने गणेश भक्तांच्या आनंदावर विरजण पडल्याचे पहावयास मिळत आहे.