गणेशोत्सव सोहळा पोलीसमुक्त व्हावा; पोलीस उप अधीक्षक

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील गणेशोत्सव हा पोलीसमुक्त व्हावा, अशी आमची रायगड पोलिसांची धारणा आहे. त्यासाठी तालुक्यातील जनताच पोलीस दलाचे नाक, कान, डोळा आहेत. त्यामुळे नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गणेशोत्सव मिरवणुकीचे नाव जिल्ह्यात उच्च पातळीवर आहे, असा गौरव पोलीस उपअधीक्षक विजय लगारे यांनी शांतता कमिटीच्या बैठकीत केला. ते म्हणाले की, पूर्वीचा इतिहास खूप सकारात्मक आहे. या ठिकाणी मिश्र वस्तीची गावं असूनदेखील सर्व सलोख्याने वागतात. त्यामुळे धार्मिक सण सर्व एकत्र मिळून वागत असतात. त्यामुळे सर्वधर्म समभाव अशी स्थिती या ठिकाणी आहे. कोणीही प्रक्षोभक सजावटी उभारू नये, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. आपण सर्व पोलिसांचे नाक, कान, डोळा आहात, हे लक्षात घेऊन आपले सण हे पोलीसमुक्त व्हावेत यासाठी सर्वांचे सहकार्य असावेत, अशी सूचना लगारे यांनी केली. नेरळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर यांनी वाहतूकबाबत टोईंग व्हॅन परिपूर्ण नसल्याने ग्रामपंचायतीने देऊनदेखील वापरात नाही. मात्र, नेरळ ग्रामपंचायत सर्व परवानग्या घेऊन गाडी आणली जाणार आहे असे स्पष्ट केले.

नेरळ पोलीस ठाणे येथे गणेशोत्सव आणि ईद ए मिलादनिमित्त शांतता कमिटीची बैठक झाली. यावेळी रायगड पोलीसचे उप अधीक्षक विजय लगारे, नेरळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर, सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी ढवळे, पोलीस उप निरीक्षक मंडलिक आदी उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांच्यावतीने व्यापारी फेडरेशनचे कमलेश ठक्कर यांनी बाजारपेठ भागात वाहने लोक कुठेही उभी करून जातात, त्यावर लक्ष देण्याची मागणी केली. तर शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख प्रभाकर देशमुख यांनी बाजारपेठमध्ये पार्किंग आहे, पण लोक वाहने पार्किंगमध्ये लावत नाहीत अशी तक्रार केली. तर गोरख शेप यांनी बाजारपेठमधील व्यापारी यांनी रात्रीच मालाचे लोडींग हे सकाळी नऊच्या आधी आणि रात्री करण्यात यावे अशी सूचना केली. सुरेश राणे यांनी गावातील नाक्यांवर पोलीस ठेवण्यात यावेत अशी सूचना केली. सिद्धार्थ सदावर्ते यांनी गणेश उत्सव काळात दुचाकी बाजारात आणू नये यासाठी काही निर्बंध घालण्यात यावेत अशी सूचना केली. शिवसेना तालुका सचिव अंकुश दाभने यांनी नेरळ रेल्वे स्टेशन समोर असलेली वाहने यांचे नियोजन करावे आणि वाहनचालक यांनी आपली रिक्षा आणि दुचाकी पार्क करून ठेवल्या असतात. ॲड सुमित साबळे यांनी फेसबुक सोशल मीडियावर धार्मिक भावना दुखावणारे मसेज दिले जावू नयेत तर कडक कारवाई केली जाईल असे नियोजन पोलिसांनी मेसेज करून आणि फलक लावून करावेत अशी सूचना केली. तर खांडस येथील सरपंच मंगल ऐनकर यांनी सणाचे कालावधीत काही लोक दारू पिऊन शिवीगाळ करणाऱ्या व्यक्तींवर समज देण्यात यावीत अशी सूचना केली.

ईदची मिरवणूक एक दिवस नंतर
मुस्लिम धर्मीय जयेद नजे यांनी आपल्या धर्माच्या वतीने 28 सप्टेंबर रोजी ईद ए मिलाद आणि अनंत चतुदर्थी दिवशी येत आहे. हिंदू लोकांचा हा सर्वात मोठा सण असल्याने दुसऱ्या दिवशी जुलूस काढण्यात येईल, असा निर्णय आम्ही मुस्लिम धर्मीयांनी घेतला असल्याचे यावेळी जाहीर केले.

Exit mobile version