| सुधागड-पाली | प्रतिनिधी |
प्रसिद्ध अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली शहरात कचऱ्याची समस्या गंभीर झाली आहे. नगरपंचायत मार्फत शहरांमध्ये घंटागाड्या फिरून देखील काही नागरिक भर वस्तीत रस्त्याच्या कडेला कचरा टाकत आहेत. परिणामी घाण आणि दुर्गंधीमुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
पालीतील कचरा समस्येवर मात करण्यासाठी काही वर्षांपूर्वी घंटा गाड्या सुरू करण्यात आल्या. सध्या पुरेशा 5 घंटागाड्या कार्यरत आहेत. या घंटागाड्या येथील विविध भागात दररोज निश्चित वेळेत फिरून कचरा गोळा करतात. आठवड्यातून एकही दिवस सुट्टी घेतली जात नाही. अगदी दिवाळीत देखील घंटागाडी नियमित येत होती. मात्र, तरीही अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढीग पडलेले असतात. प्रमुख्याने बल्लाळेश्वर नगरकडे जाणारा मार्ग, जिल्हा परिषद शाळा, आदिवासी समाज भवन शेजारी व त्यापुढे, मधली आळी, राम आळी जुने पोलीस स्थानक, आगर आळी, भाग्यश्री प्लाझा आदी ठिकाणी रस्त्याच्या कडेला कचरा टाकण्यात येतो. घंटागाडी कचरा घेऊन गेल्यानंतर झालेला कचरा काही दुकानदार आणि अनेक नागरिक घरात किंवा सोयटीमध्ये साठवून न ठेवता लागलीच रस्त्यावर टाकतात. तर काहीजण दिवसभर घरी नसल्यास जमा झालेला कचरा रस्त्याच्या कडेला टाकून देतात. परिणामी कचऱ्याची समस्या जैसे थेच राहते. यामुळे नागरिकांसह भाविकांचे आरोग्य देखील धोक्यात आले आहे. भटके कुत्रे व जनावरे हा कचरा अस्ताव्यस्त करतात. तसेच गुरे-ढोरे व भटके कुत्रे यातून अन्न शोधण्यासाठी जातात आणि हा सर्व कचरा व घाण रस्त्यावर व बाजुच्या गटारात पडते. आणि गटारे तुंबून आणखी समस्या उद्भवते.
योग्य नियोजनाची आवश्यकता
लोकांना कचरा विलगीकरणाचे महत्व पटवून देणे गरजेचे आहे. तसेच कचरा संकलित करताना ओला, सुका, घरगुती, घातक, प्लास्टिक, जैववैद्यकीय व इलेक्ट्रॉनिक कचरा असे वर्गीकरण करणे आवश्यक आहे. यासाठी नागरिकांचे प्रबोधन होणे आवश्यक. संपुर्ण शहरात घनकचरा व्यवस्थापन व विलगीकरणाचे काम होणे आवश्यक आहे. तरच कचरा कोंडी सुटेल.
सूचना फलकांकडे दुर्लक्ष
ज्या ज्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला कचरा टाकला जातो त्या ठिकाणी नगरपंचायत च्या माध्यमातून सूचना व माहिती फलक लावण्यात आले आहेत. त्याबरोबरच जे या ठिकाणी कचरा टाकतील त्यांच्यावर कायदेशीर व दंडात्मक कारवाई केली जाईल हे देखील या फलकांवर नमूद केले आहे. मात्र, नागरिक या फलकांकडे दुर्लक्ष करून त्याच्या आजूबाजूलाच कचरा टाकताना दिसत आहेत. काही ठिकाणचे माहिती व सूचनाफलक फाटले देखील आहेत.
पाली नगरपंचायतीने स्वच्छ भारत अभियान अंतर्गत पाली शहर कचराकुंड्या मुक्त केले आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांनी आपला कचरा हा येणाऱ्या घंटा गाडीतच टाकावा. जेणेकरून आपले शहर स्वच्छ व सुंदर राहील. हटविण्यात आलेल्या कचरा कुंडीच्या ठिकाणी किंवा इतरत्र कुठेही कोणी कचरा टाकताना आढळल्यास घनकचरा व्यवस्थापन नियमानुसार दंडात्मक कारवाई देखील करत आहोत. या ठिकाणी सूचना फलक लावण्यात आले आहेत. तसेच वारंवार सूचना देखील देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी शिस्त पाळण्याची गरज आहे.
-माधुरी मडके, मुख्याधिकारी,
पाली नगरपंचायत







