नागरिकांचे आरोग्य धोक्यात
। पाली । प्रतिनिधी ।
जांभूळपाडा येथे कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून गावातील विविध ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचल्याचे चित्र आहे. काही नागरिकांकडून अंबा नदीच्या पात्रातच कचरा टाकला जात असल्याने नदीचे पाणी प्रदूषित होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने तातडीने कचरा व्यवस्थापनाची ठोस व्यवस्था करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
दरम्यान, मारुती देवस्थानने व्यायामशाळेच्या बाजूला खोदलेल्या खड्ड्यात सांडपाणी साचत असून त्यावर मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे व्यायामशाळेत येणाऱ्या युवकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत आरोग्य विभागाला माहिती देण्यात आली असल्याचे सांगण्यात येत असले, तरी अद्याप संबंधित ठिकाणी ठोस कारवाई झालेली नसल्याची युवकांची तक्रार आहे.
विशेष म्हणजे, इतर गावांमध्ये नदीपात्रात कचरा टाकला जात असल्यास त्याविरोधात आवाज उठविणारेच स्वतःच्या गावात नदीपात्रात कचरा टाकत असल्याने ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण’ अशी परिस्थिती निर्माण झाल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे. ग्रामपंचायतीकडे कचरा संकलन, वर्गीकरण व विल्हेवाटीसाठी ठोस योजना नसल्यामुळे काही नागरिकांकडून निषेध म्हणून जागोजागी कचरा टाकला जात असल्याचेही बोलले जात आहे. कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न ग्रामपंचायतीसमोर मांडण्याऐवजी नागरिकांनीच सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे सुरू ठेवल्यास त्याचा फटका अखेरीस गावकऱ्याच्याच आरोग्याला बसणार आहे. कचऱ्यामुळे मोकाट जनावरे व भटक्या कुत्र्यांना सहज खाद्य मिळत असल्याने त्यांची संख्याही परिसरात वाढत असल्याची नागरिकांची चर्चा आहे. या परिस्थितीवर ग्रामपंचायतीने तातडीने उपाययोजना करून नियमित कचरा संकलन, योग्य विल्हेवाट, नदीपात्राची स्वच्छता आणि सांडपाण्याची व्यवस्था करावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. गाव स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी ग्रामपंचायत आणि नागरिक दोघांचीही असून, नदीपात्रात कचरा न टाकता कचरा व्यवस्थापनासाठी ग्रामपंचायतीकडे योग्य व्यवस्था करण्याची मागणी करण्याची गरज आहे.






