| सांगली | प्रतिनिधी |
राज्य सरकार केवळ राजकारण आणि जाहिरातबाजी करण्यात व्यस्त आहे, शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सरकार दुर्लक्ष करत आहे, असा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी शुक्रवारी येथे केला. ऊस दरासंदर्भात सांगली जिल्ह्यातील कोंडी अद्याप कायम आहे. आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राजारामबापू पाटील साखर कारखाना कार्यस्थळावर आंदोलन सुरू केले आहे. पोलिस प्रशासनाने याबाबतची बैठक घडवून आणली, मात्र चर्चेत तोडगा निघाला नाही.
कार्यकारी संचालक आर. डी. माहुली यांनी सांगलीत झालेल्या बैठकीचा संदर्भ देत 2023-24 साठी पहिली उचल 3100 रुपये मान्य केली असून, हा अंतिम दर नसल्याचे सांगितले. यावर्षी कारखाना 100 दिवस चालेल, त्यामुळे उतारा कमीच राहील, सव्वा दहाच्या पुढे रिकव्हरी गेल्यास पन्नास रुपये ज्यादा देता येतील. रिकव्हरी वाढली तर जास्त दर देण्याचा प्रयत्न राहील. खासगी कारखान्यांच्या तुलनेत सहकारी कारखान्यांना दर जाहीर करताना शासनाच्या नियम अटींना अधीन राहावे लागते, असे सांगत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र, शेट्टी यांनी ती धुडकावून लावत तिथून गाडीतळावर मोर्चा वळवला.
मागील वर्षाची एफआरपी कमी असतानाही कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील कारखान्यांनी त्यापेक्षा ज्यादा पहिली उचल देण्याचे जाहीर केले आहे. सांगली जिल्ह्यातील कारखानदार जयंत पाटील यांच्या निर्णयाकडे लक्ष ठेवून आहेत. ते राज्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहेत, अवकाळीवर बोलत आहेत, पण इथे त्यांच्याच जवळचा शेतकरी अडचणीत आहे, याकडे दुर्लक्ष आहे. गेले महिनाभर आंदोलन सुरू आहे, त्यावर काही बोलायला तयार नाहीत.
पाटील यांनी जाहीर केलेला 3100 रुपयांचा दर आम्हाला मान्य नाही. राजारामबापू कारखान्याने किमान 3310 रुपये पहिली उचल जाहीर करावी, यावर आम्ही ठाम आहोत. कोल्हापूर जिल्ह्यातील कारखाने देऊ शकतात, तर हे का देऊ शकत नाहीत, असा सवालही त्यांनी केला.