राधाकृष्ण विखेंचं आश्वासन
| अहमदनगर | प्रतिनिधी |
गांजीभोयरे, वडुले, सांगवीसूर्या व पानोली या गावात गारपिटीने मोठे नुकसान झाले आहे. या भागातील शेतकऱ्यांच्या पिकांना शंभर टक्के नुकसान भरपाई देण्यात येईल. इतरही ठिकाणी झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे येत्या दोन दिवसांत पूर्ण केले जातील. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तीन हेक्टरपर्यंत नुकसानभरपाई दिली जाईल. जनावरांसाठी चाराही देण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना दिले.
पालकमंत्री विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांसमवेत तालुक्यातील गारपीटग्रस्त गावांचा दौरा केला. त्यांनी गांजीभोयरे, सांगवी सूर्या, वडुले व पानोली येथील गारपीटग्रस्त पिकांची पहाणी करत शेतकऱ्यांशी संवादही साधला. यात गांजीभोयरे येथील एकनाथ खोडदे, दादाभाऊ खणसे, तर सांगवी सूर्या येथील संदीप कोठावळे आदींच्या कांदा पिकाच्या नुकसानीची पाहणी केली.