सरकारचे दुष्काळाकडे दुर्लक्ष; शरद पवारांची टीका

| मुंबई । प्रतिनिधी ।

पाण्याचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. पाण्याच्या टंचाईमुळे चिंताजनक स्थिती आहे. राज्यात यंदा 10, 572 टँकर लागत आहेत, मागील वर्षी 1,108 टँकर लागत होते. यावरुन स्थितीचे गांभीर्य लक्षात येईल. जनावरांच्या चार्‍याची आवश्यकता आहे. राज्यात अनेक ठिकाणी चारा छावण्यांची मागणी करण्यात येत आहे. संभाजीनगर आणि पुण्यामध्ये दुष्काळी काम काढणे, किंवा रोजगार हमीचे काम काढणे आवश्यक आहे, असे शरद पवार यांनी सूचवले आहे. राज्याची स्थिती गंभीर असून सरकारचे त्याकडे लक्ष नसल्याची टीका पवारांनी केली आहे.

शरद पवार यांनी आज दुष्काळी स्थितीवर भाष्य करण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. पीक कर्जाचे पुर्नगठन, विमा कंपन्यांची नुकसान भरपाई देण्यासंबंधीची टाळाटाळ, वीज बिलात सूट मिळणे, मनरेगा कामांसंबंधी नियम शिथिल करणे, दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर जनावरांच्या चारा छावण्या सुरू करणे आदी विषयांवर त्यांनी राज्य शासनाचे लक्ष वेधले.

आपल्याकडे सर्वात जास्त धरणे आहेत. पण, या धरणाची अवस्था अत्यंत वाईट आहे. संभाजीनगरमध्ये 10 टक्के पाणी आहे. पुणे विभागात 35 धरणे आहेत तिथे 16 टक्के पाणीसाठा आहे. नाशिकमध्ये 22 धरणे आहेत तिथे 22 टक्के पाणी आहे. कोकणात 29 टक्के पाणी आहे, उजनी धरणामध्ये उपयुक्त पाणीसाठा शून्य आहे. मराठवाड्यातील जायकवाडी धरणात 5 टक्के पाठीसाठा आहे, माजलगावमध्ये शून्य टक्के पाणीसाठा आहे, मांजरा धरणात अर्धा टक्कासुद्धा पाणी नाही, धाराशिव जिल्हात शून्य टक्के पाणीसाठा आहे, अहमदनगरमध्ये 9 टक्के पाणीसाठा आहे, अशी माहिती पवारांनी दिली आहे.

मे महिन्याच्या शेवटाकडे आपण आहोत, पण जूलैपर्यंत हीच स्थिती असणार आहे. पाऊस पडतो, पण धरणे भरण्यासाठी वेळ लागतो. संभाजीनगरमध्ये 1867 टँकर लागत आहेत. वेळीच लक्ष दिले नाही तर स्थिती गंभीर होईल. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. पुण्यामध्ये 632 गाव आणि वाड्यामध्ये 755 टँकर सध्या लागत आहेत, असे पवार म्हणाले.

Exit mobile version