कोकणातील हापूस एपीएमसीत दाखल

। नवी मुंबई । प्रतिनिधी ।

हवामान बदलामुळे कोकणातील हापूस हंगामाला उशिराने सुरुवात होणार असली तरी वाशीच्या एपीएमसी बाजारात सोमवारी (दि. 27) कोकणातील हापूस आंब्याच्या 24 पेट्या दाखल झाल्या. त्यामुळे हापूस आवक होण्यास सुरुवात झाली असून 4 ते 6 डझन पेटीला 10 हजार ते 15 हजार रुपये भाव मिळाला.
यंदा हापुसचे उत्पादन चांगले असेल. मात्र, हवामान बदलामुळे हंगामाला उशिराने सुरुवात होणार असून 15 मार्चनंतर मोठ्या प्रमाणात आवक वाढेल, असे मत व्यापार्‍यांनी व्यक्त केले आहे.

दरवर्षी जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात हापूस दाखल होण्यास सुरुवात होते, तर डिसेंबरमध्ये तुरळक पेट्या दाखल होण्यास सुरुवात होत असते. मात्र, यंदा हवामान बदलाने हापूसच्या उत्पादनाला फटका बसला. फळधारणा सुरू असलेल्या आंब्याचे नुकसान झाले होते. हापूसला मोहोर फुटण्याची वेळ आणि हवामान बदल, परतीचा पाऊस तसेच, कडाक्याची थंडी त्यामुळे अतिमोहोर फुटून बहुतांश ठिकाणी फळधारणा झाली नाही. तर थ्रिप्स रोगामुळेदेखील मोहर गळून गेला. त्यामुळे सुरुवातीच्या उत्पादनाला फटका बसला. आता पुन्हा नव्याने मोहोर फुटला असून हवामानावर उत्पादन अवलंबून आहे, अशी माहिती हापूस शेतकर्‍यांनी दिली आहे. त्यामुळे यंदा हापुसची आवक चांगली आवक होणार असून हंगामाला मात्र विलंब होणार आहे. मार्च महिन्यात आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढेल. त्यामुळे खवय्यांना हापूस आंब्याची चव चाखण्यासाठी मार्चपर्यंत वाट पहावी लागणार आहे.

Exit mobile version