गोलंदाजीत दाखवली चमक, संघाला मिळवून दिला दणदणीत विजय
| नवी मुंबई | वृत्तसंस्था |
विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत 19 ऑक्टोबर रोजी बांगलादेशविरुद्ध गुडघा दुखावल्यामुळे क्रिकेटपासून दूर राहिलेल्या हार्दिक पंड्याने चार महिन्यांनंतर स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे. डी.वाय. पाटील ट्वेन्टी-20 क्रिकेट स्पर्धेत हार्दिकने अष्टपैलू कामगिरी केली. त्यामुळे त्याच्या रिलायन्स-एक संघाने बीपीसीएल संघाला दोन गड्यांनी हरवले. या सामन्यात हार्दिकने (2/22) अशी गोलंदाजीत चमक दाखवली. त्यामुळे बीपीसीएल संघाला 18.3 षटकांत 126 धावांवर रोखण्यात आले.
हार्दिकला देव लाकरा (3/31) व पियुष चावला (3/15) यांची साथ मिळाली. प्रत्युत्तरात रिलायन्सने नमन धीर व नेहक वधेरा यांच्या 51 धावांच्या सलामीने संघाला चांगली सुरुवात करून दिली. यानंतर मध्यक्रमातील फलंदाजांनी निराशा केल्याने रिलायन्सची अवस्था एक बाद 87 वरून आठ बाद 113 अशी बिकट झाली. यानंतर पंड्या व चावला यांनी संयमाने खेळ करीत संघाला 15व्या षटकात विजय मिळवून दिला. आयपीएल 2024 मध्ये हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करताना दिसणार आहे. गुजरात टायटन्ससाठी दोन हंगाम गाजवल्यानंतर मुंबईने हार्दिकला विकले. आयपीएल लिलावापूर्वी मुंबईने जाहीर केले होते की यावेळी संघाची कमान रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याकडे असेल.