उष्माघातात वाहतूक कोंडीची भर

शहरातील बेशिस्त वाहनांवर कारवाईची मागणी,
वाहतूक पोलीस-नगर परिषदच्या समन्वय आवश्यक

| उरण । वार्ताहर ।

एकीकडे उन्हाचा पारा चढू लागला आहे. त्यातच उरण शहरातील वाहतूक कोंडीतही दिवसभराची भर पडली आहे. भर उन्हात होऊ लागलेल्या सातत्याच्या कोंडीमुळे नागरिक आणि वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे शहरातील बेशिस्त वाहनांवर कारवाई कधी होणार, असा सवाल नागरिक करीत आहेत.

उरण शहरातील बेशिस्त वाहन पार्किंगमुळे वाहतूक कोंडीत भर पडू लागली आहे. नगर परिषदेने शहरात सम, विषम तारखांचे व नो पार्किंगचे फलक बसविले आहेत. मात्र अशा फलकांनंतर वाहनांवर कारवाई होणार का, असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे. यापूर्वीही उरण नगर परिषदेने शा प्रकारचे फलक बसविले होते. मात्र त्याची अनेक वर्षे अंमलबजावणी न झाल्याने कोंडीत भर पडली आहे.

उरण शहर व परिसरातील लोकवस्ती वाढू लागली आहे. त्यामुळे उरण शहरातील रस्ते वाहनांच्या तुलनेत अपुरे पडू लागले आहेत. मात्र त्यातही चारचाकी व दुचाकी वाहन चालकांच्या बेशिस्त वाहन पार्किंगमुळे शहरातील नागरिकांना सततच्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी वाहतूक पोलीस व उरण नगर परिषद यांच्यात समन्वय होणे आवश्यक आहे. तरच ही समस्या काही प्रमाणात दूर करण्यात यश येईल.

वाहतूक विभागाजवळ मनुष्यबळ नसल्याने ही समस्या वाढू लागली आहे. मात्र पोलीस आणि नगर परिषद यांनी सयुक्तिक कारवाई सुरू केल्यास समस्या दूर होऊ शकते, असे मत उरणमधील सामाजिक कार्यकर्ते महेश घरत यांनी व्यक्त केले आहे. तर उरण शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी उरण नगर परिषदेने जनजागृती म्हणून एक शॉर्ट फिल्म प्रसिद्ध केली आहे. ज्यामुळे नागरिक स्वयम् शिस्त पाळतील आणि वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी मदत होईल अशी अपेक्षा आहे. मात्र या फिल्मबद्दल शहरातील नागरिकांकडून अनेक मते व्यक्त केली जात आहेत. नगर परिषद आपली जबाबदारी नागरिकांवर झटकत असल्याचेही अनेक नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे उरण नगर परिषदेने वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी यंत्रणा राबवावी, कोंडीला कारणीभूत असलेल्या त्रुटी दूर कराव्यात आणि त्यानंतर नागरिकांचे सहकार्य मागावे, असेही अनेक नागरिकांचे मत आहे.

Exit mobile version