सावधान! मुंबईत जायचंय तर हे नक्की वाचा!


पुढील चार दिवस मुंबईसह अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट; मुसळधार पावसाचा इशारा
। मुंबई । प्रतिनिधी ।
(Mumbai) मुंबईत शुक्रवारी सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. सततच्या पावसामुळे शहरातील बर्‍याच भागात अनेक फुटांपर्यंत पाणी साचलं असून यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळता आहे. नैऋत्य मॉन्सून मुंबईत दाखल होताच पुन्हा एकदा सगळीकडे पाणीच पाणी झालं आहे.


हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील एक आठवडापर्यंत असाच पाऊस असेल. इतकंच नाहीतर पुढील 4 दिवस मुंबईसाठी रेड अलर्टही जारी करण्यात आला आहे. मुंबईव्यतिरिक्त ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातील शेजारच्या जिल्ह्यांसाठीही रेड अलर्ट देण्यात आला आहे. आजही मुंबईत भरतीची भीती व्यक्त केली जात आहे.


खरंतर, दक्षिण-पश्‍चिम मान्सून वेळेपेक्षा दोन दिवस अगोदर मुंबईत दाखल झाला आहे. मुसळधार पावसामुळे अंधेरी पूर्वेतील सबवे महामार्गाला पूर आला असून वाहनांना ये-जा करण्यात अडचणी येत आहेत. मुंबईच्या सायन स्टेशनजवळ रस्तेही पाण्याखाली गेल्याचं चित्र आहे. गुरुवारी सकाळी साडे आठ ते साडेपाचच्या दरम्यान 221 मिलीलीटर पाऊस पडला. जून महिन्यात आतापर्यंत मुंबईत 426 मिलीलीटर पावसाची नोंद झाली आहे. तर सहसा इथं 89 मिमी पाऊस पडतो. मुसळधार पावसाने देशाच्या आर्थिक राजधानी व त्याच्या उपनगरामध्ये अनेक ठिकाणी पाणी साचलं. यामुळे जनजीवनावर परिणाम झाला असून रस्ता वाहतुकीसह लोकल ट्रेनमध्ये अडथळा निर्माण झाला. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, पालघर आणि अलिबागमध्ये पूर येण्याचा धोका आहे.


हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज कोकणातील (sindhudurga) सिंधुदुर्ग, (Raigad) रायगड, (mahabaleshwar) महाबळेश्‍वर आणि (Ratnagiri) रत्नागिरीसह इतर भागातही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. अरबी समुद्राच्या पूर्व-मध्य आणि उत्तरेकडील बाजूने आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्र तयार झाल्यामुळे मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे. यावेळी पावसाळ्यात 18 दिवस मोठ्या भरतीची शक्यता आहे. यावेळी समुद्राच्या लाटांची उंचीही 10 मीटरपर्यंत जाऊ शकते असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.

Exit mobile version