| अलिबाग | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसासह गेल्या दोन दिवसांत पडलेल्या मुसळधार पावसामुळे महावितरणची मोठी हानी झाली आहे. त्यात विद्युत खांबासह पाचशेहून अधिक उपकरणांचे नुकसान झाले आहे. असे एकूण दीड कोटीहून अधिक नुकसान झाल्याची माहिती महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता धनराज बक्कड यांनी दिली आहे.
रायगड जिल्ह्यामध्ये महावितरणचे जाळे शहरी भागासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पसरले आहे. जिल्ह्यात 2 हजारहून अधिक वेगवेगळे प्रकल्प, उद्योगधंदे असून सरकारी कार्यालये, शासकीय वसाहतींबरोबरच घरगूती वीज कनेक्शनची मागणी प्रचंड वाढली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी विद्युत तारा, विद्यूत खांब बसविण्याचे काम महावितरण कंपनीचे कर्मचारी करत असतात. विद्युत पुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी महावितरण कंपनी काम करीत आहे. मात्र, जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षापासून वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीमुळे महावितरणला फटका बसत आला आहे. त्याचाच एक भाग म्हणजे मे महिन्यामध्ये शेवटच्या आठवड्यात आणि जून महिन्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीत महावितरण कंपनीचे खूप नुकसान झाले आहे. त्यात उच्च दाब वाहीनीसह लघु दाब वाहीनीचे 315 विद्युत पोल पडले असून दहा ते पंधरा किलोमीटर अंतरापर्यंत विजांच्या तारा तुटल्या आहेत. तसेच, 138 रोहित्रांमध्ये बिघाड झाला आहे. त्यामध्ये महावितरण कंपनीचे दीड कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती अधीक्षक अभियंता धनराज बक्कड यांनी दिली आहे.
अलिबाग विभागालाही फटका
जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात अतिवृष्टीमध्ये 32 विद्युत खांब कोसळले असून 12 रोहित्रांमध्ये बिघाड झाला आहे. तसेच, उच्च दाब वाहिन्यांचे पावणे दोन किलोमीटर व लघु दाब वाहिनीचे एक किलोमीटर अंतरापर्यंत तारा तुटल्या आहेत. अलिबाग विभागालाही अतिवृष्टीचा फटका बसला आहे. आतापर्यंत विद्युत सेवा सुरु करण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत 70 टक्केहून अधिक काम पुर्ण झाले आहे. विद्यूत सेवा खंडीत नाही. ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून पर्यायी सेवा उपलब्ध करण्यात आल्याची माहिती कार्यकारी अभियंता कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
