| नेरळ | प्रतिनिधी |
समाजात अनेक प्रश्न घालवून कार्य करणार्या महिला कार्यकर्त्यांचा दररोज सन्मान व्हायला हवा त्यासाठी आपल्या आजूबाजूला असलेल्या हिरकणी यांच्याशी पाठीशी उभे राहून त्यांचे कौतुक करायला हवे, असे प्रतिपादन ब्रह्मकुमारी सरलादेवी यांनी केले. नेरळजवळील जिते या गावी साई आधार फाऊंडेशन आणि विठ्ठल रखुमाई मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने समाजातील हिरकणींचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी राज्यभरातील 300 हून अधिक कर्तृत्ववान महिलांना हिरकणी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्या कार्यक्रमात सरलादेवी बोलत होत्या.
नाशिक येथील साई आधार सोशल हेल्थ फाउंडेशन आणि जिते येथील धार्मिक क्षेत्रात काम करणारे विठ्ठल रखुमाई मंदिर संस्थान यांच्या माध्यमातून समाजातील कर्तृत्ववान महिवाल यांना हिरकणी पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचा कार्यक्रम नेरळजवळील जिते येथील देवा रिसॉर्टमध्ये आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी रायगडभूषण हभप राणे महाराज यांच्यासह अंकशास्त्र आणि वास्तू शास्त्रज्ञ जानकी नाईक, योग रेकॉर्ड करणार्या प्रज्ञा पाटील, मिसेस ग्लोबल 2020 पूनम बिरारी, पोलीस अधीक्षक वर्षा घेवारे यांच्यासह संस्थेचे अध्यक्ष संजय देशमुख, विजयबुवा घरत यांच्यी प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमात समाजातील सर्व क्षेत्रात कार्यरत असलेल्या 300 हून अधिक कर्तृत्वावान महिलांना हिरकणी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यात राज्यातील बहुतेक सर्व जिल्ह्यातील महिला कार्यकर्ती यांचा समावेश होता. त्यात मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे, पालघर, नगर, जळगाव, सोलापूर, बीड, धाराशिव, संभाजीनगर, रायगड आदी जिल्ह्यातील महिला उपस्थित होत्या.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी साई आधार फाऊंडेशनचे उपाध्यक्ष संतोष धात्रक, सचिव उद्यम सिंह, सहा सचिव प्रवीण पाटील, तसेच विठ्ठल रखुमाई मंदिर संस्थांनचे संतोष जाधव, मनीषा घरत, विजयालक्ष्मी अहिरे, कलपना सोनार, राजेश साळी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा सहभाग होता.