अपघातातील मयत दाम्पत्याची चार लाखांची रोकड कुटुंबियांकडे सुपूर्द
। पनवेल । वार्ताहर ।
कायदा आणि सुव्यवस्थेचे रक्षण करत असताना अनेकदा खाकी हिसका पोलिसांना दाखवावा लागतो. याचा अर्थ ते पूर्णपणे कठोर आणि निष्ठूर आहेत असे अजिबात नाही. तेसुद्धा समाजातील एक घटक आहेत, आपल्यासारखे माणस आहेत. आणि माणुसकी, संवेदनशीलता त्यांच्यामध्ये कायम जागृत आहे, याचा प्रत्यय नुकताच पनवेल-मुंब्रा महामार्गावर अपघातात मयत झालेल्या दांपत्याचे तळोजा पोलिसांनी चार लाख रुपये त्यांच्या कुटुंबियांना परत केल्यानंतर आला. त्या दोन अंमलदाराच्या प्रामाणिकपणाचा सन्मान नेरूळ येथील सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा नंदकुमार हाडोळे यांनीसुद्धा केला.
तळोजा परिसरात राहणार्या एका मुस्लिम धर्मीय जोडप्याने हज यात्रेला जाण्यासाठी बँकेतून रोकड काढली. मात्र, घरी परतत असताना मुंब्रा-पनवेल मार्गावर त्यांचा अपघात झाला. त्यावेळी मनोहर पाटील व किशोर कार्डिले यांची तिथेच ड्युटी होती. त्यांना या अपघाताची माहिती मिळताच ते तातडीने घटनास्थळी पोहोचले. अपघातात गंभीर जखमी झालेल्या या दोघांनाही त्यांनी तातडीने रुग्णालयात नेले. मात्र, तोपर्यंत या दोघांनी दाम्पत्यांची प्राणज्योत मालवली. ड्युटीवर असलेल्या पाटील आणि कार्डिले यांनी त्यांची ओळख पटवण्यासाठी काही कागदपत्रे सापडताहेत का या हेतूने त्यांच्या दुचाकीची तपासणी केली. त्यावेळेस स्कुटरच्या सीटखाली त्यांना रोकड सापडली. तळोजा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या दोन अंमलदारांनी ही चार लाखांची रोकड ताब्यात घेतली व पोलीस ठाण्यात जमा केली. त्यानंतर अपघातात मृत्यू झालेल्या दांम्पत्याच्या मुलाला पोलीस ठाण्यात बोलवून हे पैसे त्यांच्याकडे सुपूर्द केले. मनोहर पाटील व किशोर कार्डिले या दोन पोलीस कर्मचार्यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे. याच उद्देशाने नेरुळ येथील सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा नंदकुमार हाडोळे यांनीही या दोनही कर्तव्यनिष्ठ पोलीस अमलदारांचा यथोचित सन्मान केला.