बी.जी.पाटील यांचा सवाल
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. सुहास माने हे कोणत्याही ठोस आश्वासनाशिवाय वारंवार उपोषण मागे घेण्याचे आवाहन करतात. मात्र कोणतेही अधिकार आपल्याला नसल्याचेही मान्य करतात तर मग आमच्या मागण्यांवर कोणतीच कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा निश्चय उपोषणकर्ते समाजक्रांती आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष बी जी पाटील आणि अधिपरिचारीका यांनी व्यक्त केला आहे.
याबाबत समाजक्रांती आघाडीच्या वतीने देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुहास माने आम्हाला दररोज येऊन विनंती करत असतात की तुमचे उपोषण स्थगित करा व आम्हाला सहकार्य करा. परंतु आम्ही त्यांना सांगितले की आमचे उपोषण स्थगित करायचे असले तर आमच्या अधिपरिचारीकांना 18 महिन्यांचे शासकीय आदेश देण्याविषयी सकारात्मक निर्णय द्या. त्यावर ते म्हणतात की ते आमच्या हातात नाही. ज्यामुळे हे अधिकार ज्यांच्या हातात आहेत त्या आरोग्यमंत्री, आरोग्य सचिव डॉ प्रदीप व्यास, अप्पर सचिव अर्चना वाघझरे, यांच्याबरोबर आमची बैठक आयोजित करुन द्या. त्याबाबतचे पत्र ठाणे येथील उपसंचालक डॉ चाकुरकर व जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे शुक्रवार दि. 1 एप्रिल रोजीच दिले आहे. मात्र त्यावर अजूनही काहीच कार्यवाही झालेले नसतात आम्ही कोणत्या आधारे उपोषण स्थगित करायचे असा सवालही बि जी पाटील यांनी केला आहे.