शिक्षणासोबत प्रकल्पाचे काम; कोळंबी उत्पादनातून लाखोंचे उत्पन्न
। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
वाणिज्य शाखेतून एमबीएचे शिक्षण घेत वडिलोपार्जित कोळंबी प्रकल्पामधून आंबवली बुद्रुक येथील हृषिकेश केळकर हा तरुण दरवर्षी हेक्टरी अडीच ते तीन लाख रुपये उत्पन्न मिळवत आहे. शिक्षणासोबत या प्रकल्पामध्ये वेगवेगळ्या संकल्पना राबवून उत्पन्न वाढवण्याचा हृषिकेशचा मानस आहे.
केळशीपासून जवळच असलेल्या आंबवली बुद्रुक येथील शेतकरी महेश केळकर यांनी खाडीच्या पाण्याचा वापर करून स्वतःच्या मालकीच्या जागेत 1998 साली कोळंबी प्रकल्प सुरू केला होता. केळशी उटंबर परिसराला लाभलेल्या सागरी किनार्याचा उपयोग करून कोळंबी प्रकल्प उभारण्याचे स्वप्न आंबवलीतील महेश केळकर यांनी प्रत्यक्षात उतरवले आहे. येथील गरीब शेतकर्याजवळ आर्थिक बाब नसल्यामुळे बँकेकडून कर्ज घेऊन प्रकल्प उभा करण्यात जोखीम असल्याने येथील शेतकरी आंबा, काजू, नारळ, सुपारी यांचे उत्पादन घेण्यात व्यस्त राहिला आहे.
त्यामुळे येथील शेतकर्याला नैसर्गिक आपत्तीमुळे फार मोठ्या प्रमाणात होणार्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे; परंतु, महेश केळकर यांनी मोठे धाडस दाखवत हा कोळंबी प्रकल्प उभा केला आहे. सुरुवातीला त्यांनी टायगर कोळंबीचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. काहीतरी वेगळा व्यवसाय करावा, असे विचार या शेतकर्यांच्या मनात आले. त्यामुळे त्यांनी खाडीचे पाणी आपल्या शेतात घेऊन कोळंबी प्रकल्प साकारला. या प्रकल्पातून दरवर्षी दर हेक्टरी सुमारे अडीच ते तीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. पॉड तयार करण्यासाठी व प्रकल्प उभारण्यासाठी येणारा खर्च खूप मोठ्या प्रमाणात येतो. प्रकल्पाच्या जागेचे प्रथम निर्जंतुकीकरण करून काही प्रमाणात शेवाळ तयार केली जाते. पंधरा ते वीस दिवसांनंतर केसाच्या आकाराएवढे कोळंबी बीज त्यामध्ये सोडले जाते. कोळंबी बीज हे चेन्नई, विशाखापट्टणम आदी ठिकणांहून आयात केले जाते.
हृषिकेश केळकरची नव्याने सुरूवात
कामगार मजुरी व औषधांचा खर्च जवळजवळ लाख रुपये येतो. त्यात पॉड्सची बांधणी, गेट, पंप, बंधारा जाळी, आदींचा समावेश असतो; मात्र, पॉड तयार झाले की, कोळंबी बियाण, कोळंबीचे खाद्य यावर खर्च करावा लागतो. दिवस-रात्र या तलावाची राखण करावी लागते. 400 ते 500 रुपये किलो दराने ही कोळंबी बाहेरगावी पाठवली जाते. 1998 पासून सुरू केलेला प्रकल्प 2008 पर्यंत स्वतः महेश यांनी चालवला. नंतर टायगर कोळंबीच्या येणार्या बियाणामध्ये वेगवेगळे रोग येऊ लागल्यामुळे 2008 ते 2013 पर्यंत हा प्रकल्प बंद होता. त्यानंतर पुन्हा 2013 ते 2023 पर्यंत हा प्रकल्प भाड्याने चालवायला दिला होता. त्यानंतर आता महेश यांचा मुलगा हृषिकेश केळकर याने हा प्रकल्प 1 जानेवारी 2024 पासून नव्याने सुरू केला आहे.