सीमाप्रश्नावरुन विरोधक आक्रमक, मुख्यमंत्र्यांचेही प्रत्युत्तर
| नागपूर | प्रतिनिधी |
सीमाप्रश्नांवरुन सोमवारी विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्तारुढ आणि विरोधक यामध्ये प्रचंड गदारोळ झाला. यामुळे विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. सीमाप्रश्नावरुन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला. त्यांच्या या आरोपांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही प्रत्युत्तर दिले.
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा प्रारंभ वंदेमातरमने करण्यात आला. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी बोलता अजित पवारांकडून सीमावादाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांवर दडपशाही सुरू आहे. अशावेळी महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी उभा आहे. या विषयी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी बैठक झाली असताना आणि बेळगावात कोणालाही अडवणार नाही, असे ठरलं असताना जिल्हाधिकारी त्यांच्या बंदी कशी आणू शकतात? गृहमंत्र्याबरोबर झालेल्या बैठकीला एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. मात्र, गृहमंत्र्यासमोर ठरलेलं कोण मोडत आहे, हे महाराष्ट्राच्या जनतेला सांगितलं पाहिजे. त्याच्या पुढची काय कारवाई केली जाणार, हे सुद्धा समजलं पाहिजे, असं अजित पवार म्हणाले.
मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर
अजित पवारांच्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी जो मुद्दा मांडला आहे, तो महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. या मुद्द्यावर पहिल्यांदाच देशाच्या गृहमंत्र्यांनी मध्यस्थी केली आहे. गेल्या अनेक वर्षांमध्ये हे पहिल्यांदाच घडले आहे. या बैठकीत आम्ही सीमावादाच्या मुद्द्यावर ठोस भूमिका घेतली होती. महाराष्ट्रातील वाहनांवर होणारे हल्ले खपवून घेणार नाही, हे आम्ही स्पष्टपणे सांगितले होते. अमित शहा यांनी कर्नाटकच्या गृहमंत्र्यांनाही समज दिली होती. अमित शहा यांनी स्वत: पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारची भूमिका मांडली होती, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
सीमावादाच्या मुद्द्यावरून राजकारण करू नये. राजकारण करण्यासाठी अनेक मुद्दे आहेत. आधीच्या सरकारने बेळगावातील गावासांठी असलेल्या योजना बंद केल्या होत्या. आम्ही त्या योजना पुन्हा सुरू केल्या. कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतही आम्ही सीमावासियांसाठी दोन हजार कोटींची योजना सुरू केली. मुळात सीमावासीयांच्या पाठिशी आपण ठामपणे उभं राहिलं पाहिजे.
एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री
बोम्मईंच्या ट्विटरचा शोध
अमित शहांबरोबर झालेल्या बैठकीदरम्यान आम्ही कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना तुम्ही केलेले ट्वीट चुकीचं असल्याचे सांगितले आहे. त्यावर त्यांनी हे आमचं ट्वीट नाही सांगत नकार दिला. हे ट्वीट ज्यांनी केलं आहे त्यांचीही माहिती त्यांना मिळाली आहे. या ट्वीटमागे कोणता पक्ष आहे, याचीही माहिती मिळेल, असंही एकनाथ शिंदें म्हणाले.
सीमावासियांना पाठिंबा
सीमावासीयांच्या पाठीशी महाराष्ट्राचं सरकार पूर्णपणे उभं आहे. त्यांच्यावर कुठलाही अन्याय होऊ नये, अशी आमची भूमिका असणार आहे. या संदर्भात आज लोकतांत्रिक पद्धतीने आंदोलन करण्याचा प्रयत्न झाला. परंतु त्याला परवानगी नाकारण्यात आली, त्याही संदर्भातील चर्चा आम्ही कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी करू. कुठल्याही परिस्थितीत सीमाभागाच्या संदर्भातील राज्याची जी भूमिका आहे, ही तसूभरही मागे जाणार नाही. असंही यावेळी फडणवीसांनी स्पष्ट केलं.
पायर्यांवर आंदोलन
अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात होण्यापूर्वीच विधिमंडळाच्या पायर्यांवर विरोधकांनी 50 खोके सगळं ओके, सीमाभागावर अन्याय करणार्या सरकारचा धिक्कार असो… विदर्भावर अन्याय करणार्या सरकारचा धिक्कार असो.. महापुरुषांचा अवमान करणार्या सरकारचा निषेध असो.. अशा घोषणा देऊन वातावरण तापवलं. त्यानंतर सभागृह सुरु होताच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सीमाप्रश्नावरुन सरकारला बॅटफूटवर ढकलण्याचा प्रयत्न केला. अजितदादांना भुजबळांची साथ मिळाली. पुढे विरोधी पक्षाचा आवाज आक्रमक असतानाच ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनीही संधी मिळताच राज्यमंत्र्यांच्या बंगल्याच्या रंगरंगोटीवरुन सरकारला कोंडित पकडण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचा प्रयत्न फसला.
शिवसेना कार्यालयाची विभागणी
या अधिवेशनावेळी शिवसेनेच्या पक्ष कार्यालयात बदल करण्यात आलेत. शिवसेनेचं पक्ष कार्यालय आता शिंदे गटाच्या ताब्यात देण्यात आलं आहे. आमदारांची संख्या पाहता नागपूर विधिमंडळातील हे कार्यालय शिंदेगटाला देण्यात आलं आहे.