उत्पादक नाराज, व्यवसायाला उतरती कळा
| रसायनी | वार्ताहर |
रणरणत्या उन्हाने कहर केला असून, पारा दिवसेंदिवस वाढतच आहे. कडक उन्हाने नागरिकांना हैराण केले आहे. याकरिता शरीराला थंडावा मिळण्यासाठी तसेच शरीरात पाण्याची पातळी राखण्यासाठी थंड पाणी आणि शीतपेय घेण्याकडे नागरिकांचा कल वाढल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. मात्र, घरोघरी फ्रीजचा वापर वाढल्याने बर्फ व्यवसायाला उतरती कळा आली आहे.

रसायनी परिसरातील मोहोपाडा एमएसीबी कार्यालयाजवळ गेल्या 35 विश्वकर्मा बंधूंचे बर्फ विक्रीचे दुकान आहे. सध्या घरोघरी फ्रीजचा वापर होत असल्याने या व्यवसायाला उतरती कळा आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. परंतु, काही वर्षाअगोदर रसायनी पाताळगंगा औद्योगिक परिसरातील रिलायन्स, बकुळ, एचओसी आदी कंपनीत बर्फ पुरवठा करण्याचे काम विश्वकर्मा बंधूंकडून होत असे. सगळीकडे फ्रीजचा वापर वाढल्याने बर्फाची मागणी कमी झाली आहे.
मागणीत घट
प्रत्येक कंपनीत कुलिंग प्लँट असल्यामुळे आपल्या बर्फ व्यवसायाला उतरती कळा आली आहे. शिवाय, एप्रिल ते मे महिना वगळता इतर महिन्यात बर्फाला अधिक मागणी नसल्याचे त्यांनी सांगितले. सध्या साखरपुडा, लग्नसमारंभ, ज्यूस सेंटर, रसवंती यांच्याकडून मागणी असल्याचे विश्वकर्मा बंधूंनी सांगितले.