तलावांसह समुद्र खाडीमध्ये 74,347 मूर्तींचे विसर्जन
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
सहा दिवसांच्या मनोभावे सेवेनंतर शनिवारी (दि.19) मिरवणूक काढून वाजत गाजत गणरायासह गौराईला निरोप देण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील तलाव, समुद्र, नदी, खाडी, कृत्रिम तलाव अशा एकूण 595 ठिकाणी 74 हजार 347 मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यादरम्यान, बाप्पाला निरोप देण्यासाठी भक्तांचा महासागर विसर्जन घाटांवर दिसून आला.
रायगड जिल्ह्यामध्ये सोमवारी (दि.14) 1 लाख 5 हजार 345 गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. दीड दिवसांच्या गणेशमुर्तींच्या विसर्जनानंतर गुरूवारी (दि.17) गौराईचे आगमन झाले. यावेळी जिल्ह्यात 16 हजार गौराईच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करून आरती, पुजन करण्यात आले. तसेच, गौराईला वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद दाखवून “घरात सुख समृद्धी मिळो” असे साकडे घातले. या कालावधीत धार्मिक कार्यक्रमांसह सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. त्यात महिलांसह ज्येष्ठ नागरिक आणि तरुण मंडळींनी देखील उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला. यादरम्यान, घराघरात होणाऱ्या भजन व आरतीने जिल्ह्यातील वातावरण मंगलमय झाले होते. त्यानंतर सहा दिवसांच्या मनोभावे सेवेनंतर शनिवारी (दि.19) गणरायाला आणि गौराईला निरोप देण्याचा दिवस उजाडला. यादिवशी सायंकाळी 5.00 वाजल्यापासून मिरवणुकीला सुरुवात झाली. ग्रामीण भागात तर सायंकाळी 7 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत मिरवणुका आणि विसर्जन सुरूच होते. सर मिरवणूकींसोबत बेंजो व इतर पारंपारिक वाद्यांना प्राध्यान देण्यात आले. ढोल ताशांसह बेंजोच्या वाद्याने संपुर्ण परिसर दुमदुमून गेला होता. तसेच, गणरायासह गौराईच्या मिरवणुकीची गाडी फुलांसह रोषणाईने सजवली होती. मात्र, बाप्पाला निरोप देताना अनेकांचे डोळेही पाणावले होते. तरीदेखील बेंजो, ढोल ताशांसह स्पीकरवरील गाण्यांच्या तालावर अनेकजण नाचत होते. दरम्यान, वरुण राजानेदेखील मिरवणूकीच्या वेळी हजेरी लावत गणरायाला निरोप दिला. यावेळी जिल्ह्यातील समुद्रासह नदी, तलाव आणि खाडीमध्ये सुमारे 58 हजार 17 गणेशमूर्ती आणि 6 हजार 175 गौराईमूर्तीं अशा एकूण 74 हजार 347 गणेशमूर्ती आणि गौराईच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यादरम्यान, “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” अशी साद घालण्यात आली. तसेच, विसर्जनाच्या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. कृत्रिम तलावांसह, मदत कक्ष, निर्माल्य कक्ष तसेच समुद्रासह तलावांमध्ये मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी जीव रक्षक नेमण्यात आले होते. त्यामुळे हा सोहळा मंगलमय व आनंदमय वातावरणात पार पडला.
अलिबाग नगरपरिषदेमार्फत चोख व्यवस्था
अलिबाग नगरपरिषदेमार्फत समुद्रकिनारी चोख व्यवस्था करण्यात आली होती. त्यात विसर्जनस्थळी निर्माल्य कलशासह वाहनांची चोख व्यवस्था, आरती करताना गर्दी होऊ नये म्हणून एक स्वतंत्र आरती स्थळ, मदत कक्षासह स्वागत कक्षाची उभारणी, तसेच समुद्रात गणेशमूर्तींचे विसर्जन करताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून स्वतंत्र जीव रक्षकांची देखील नेमणूक करण्यात आली होती. ते गणरायासह गौराईच्या मूर्ती बोटीतून समुद्रात विसर्जन करण्याचे काम करीत होते. यावेळी नगरपरिषदेच्यावतीने समुद्रकिनारी विजेची सोय, तसेच भक्तांना ध्वनिक्षेपक यंत्राद्वारे वारंवार सुरक्षेच्या सुचना देण्यात येत होत्या.
कोंडी सोडविण्यासाठी पर्यायी व्यवस्था
विसर्जनस्थळी जाताना मिरवणूकीला वाहतूकीचा अडथळा निर्माण होऊ नये, म्हणून पोलिसांनी अन्य वाहनांना पर्यायी व्यवस्था केली होती. यावेळी अलिबाग शहरामध्ये विसर्जनच्या ठिकाणी एकेरी वाहतूक सुरु ठेवली होती. तसेच, समुद्रकिनारी विसर्जन झाल्यावर बाजारपेठातून परतीचा मार्ग काढण्यात आला होता. त्याचबरोबर क्रिडा भवन येथे वाहन पार्कींगची व्यवस्था केली होती.
तीन हजार पोलिसांचा फौजफाटा
सहा दिवसांच्या गणरायाला निरोप देण्यासाठी जिल्ह्यातील 595 विसर्जन स्थळी भाविकांची गर्दी झाली होती. त्यासाठी जिल्ह्यात एकूण 2 हजार 64 पोलीस तैनात होते. त्यात 07 पोलीस उपअधीक्षक, 29 पोलीस निरीक्षक, 128 सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक, एक हजार 900 पोलीस अंमलदारां समावेश होता. जिल्ह्याबाहेरील एक हजार शंभर पोलीस मागविण्यात आले होते. त्यात तीस अधिकारी, 300 पोलीस अंमलदार, 500 होमगार्ड यांचा समावेश होता. तसेच राज्यराखीव पोलीस दलाची एक तुकडीही सुरक्षेच्या दृष्टीने तैनात करण्यात आली होती.
