कलमांवर किडीचा प्रादुर्भाव
| रत्नागिरी | वृत्तसंस्था |
हंगामाच्या सुरुवातीलाच वातावरण बदलल्यामुळे बागायतदारांची चिंता वाढली आहे. नोव्हेंबरमध्ये पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे आंबा झाडांवर त्याचा विपरित परिणाम दिसू लागला आहे. नोव्हेंबरमध्ये पहिल्या आठवड्यात पडलेला पाऊस आणि गेले चार दिवस ढगाळ वातावरण, हलका पाऊस पडल्यामुळे हापूसच्या झाडांवरील पालवी आणि मोहोरावर तुडतुड्यासह कीड रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी बागायतदारांना फवारणी करावी लागत आहे.
गतवर्षी मोहोर न आलेली झाडे चांगल्या प्रकारे मोहोरू लागली असून काही ठिकाणी कणीही दिसू लागली आहे. पालवी फुटलेल्या झाडांनाही मोहोर जानेवारीपर्यंत येईल अशी स्थिती आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा आंबा हंगामाचे चित्र समाधानकारक राहिल अशी स्थिती सध्या वर्तवली जात आहे. परंतु गेल्या चार दिवसात ढगाळ वातावरण असल्यामुळे आंबा बागांवर त्याचा परिणाम झाला आहे. पालवीसह माहोरावर मोठ्याप्रमाणात तुडतुडे आणि कीड रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. अपेक्षित थंडी पडत नसल्याने पालवी जुन होण्यास थोडा विलंब होऊ शकतो, असे बागायतदारांचे मत आहे.
यावर नियंत्रण ठेवण्यासाठी बागायतदारांकडून औषध फवारण्या केल्या जात असल्या तरीही ढगाळ वातावरण असेच राहिले तर आलेला मोहोर तुडतुड्यामुळे सुकून गळून जाईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. गतवर्षीपेक्षा यंदा आंबा हंगामाची स्थिती चांगली राहील असे वातावरण आहे. हंगामाचे खरे चित्र 15 डिसेंबरला स्पष्ट होईल. सध्या झाडाला आलेल्या पालवीमधून माहोरे किती येतो, त्यावर उत्पादन किती मिळेल याचा अंदाज बांधता येणार आहे. त्यासाठी माफक थंडी आणि निरश्न वातावरणाची आवश्यकता आहे, असे आंबा बागायतदार राजेंद्र कदम यांनी सांगितले.