। पाली/बेणसे । वार्ताहर ।
सुधागड तालुक्याचे मुख्यालय व अष्टविनायकाचे प्रख्यात धार्मिक स्थळ असलेले पाली बसस्थानकासमोरील पटांगणात येणारे गटारातील सांडपाणी व घाणीने मोठ्या प्रमाणात जीवजंतूंची पैदास वाढत आहे, तसेच दुर्गंधीने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. राज्य परिवहन महामंडळाचे स्वछता व प्रवाशांना सोयीसुविधा देण्याच्या गंभीर बाबींकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याने जनमानसातून संताप व्यक्त होतोय. शाळकरी मुले, वृद्ध प्रवाशी, रुग्ण यांना घाणीचे सांडपाण्यातून ये जा करावी लागते, त्यामुळे या आरोग्य व रोगराईची भीती निर्माण झालीय. बसस्थानकासमोर दोन भल्या मोठ्या व उघड्या नाल्यातून मोठ्याप्रमाणावर दुर्गंधी पसरत आहे. येथील अक्षम्य अस्वछता व असह्य दुर्गंधी यामुळे बसस्थानक व आजूबाजूच्या बाजारपेठेत येणार्या जाणार्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कोरोना सारख्या जागतिक आजाराने राज्य व देशातील जनतेला बेजार केले,आजही म्हणावे तसे कोरोना चे संकट टळले नाही, सर्वत्र स्वच्छता व जनजागृतीवर भर दिला जातोय, मात्र पाली बसस्थानकात अक्षम्य अस्वछता दिसून येतंय, घाणीचे सांडपाण्यातून लोकांना यावे जावे लागते, त्यामुळे रोगराईची भीती वाढली आहे. परिवहन महामंडळाने त्वरित योग्य ती कार्यवाही करावी असे नियमित प्रवाशी मंगेश कदम यांनी सांगितले. तर गणेश कदम म्हणाले की पाली बसस्थानक नेहमीच दुर्लक्षित राहिले आहे, पालीचा कारभार सांभाळण्यासाठी सरपंच नाहीत, तर नगरपंचायतीचा कारोभार तहसीलदार पाहत आहेत, वारंवार अस्वछतेच्या प्रश्नावर तक्रारी करून देखील उपाययोजना होत नाहीत, शिवाय परिवहन महामंडळाला जनतेच्या आरोग्याशी काही घेणे देणे नाही असे दिसते. पाली बसस्थानकाचे प्रवेशद्वार असलेल्या मार्गावर मागील अनेक वर्षांपासून दोन मोठे नाले आहेत. या नाल्यात गटाराचे घाणीचे पाणी तुंबत असून अनेक कीटक जीवजंतू ची पैदास होत आहे. शिवाय हे नाले उघडे असल्याने यातून सतत दुर्गंधी येत असते.पावसाळ्यात या नाल्यात जिव जंतू व कीटक मोठ्या प्रमाणावर दिसून येतात,या नाल्यात अनेकदा वाहने फसून अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. नागरिकांची सातत्याने मागणी होऊन देखील अद्यापपर्यंत या नाल्यांच्या बाबत कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली दिसत नाही.