वसंतऋतुत निसर्गाचे रुप बदलू लागलंय

कुठे पानगळ तर कुठे रंगेबिरंगी कोवळ्या पानांची लयलूट
। पाली/बेणसे । धम्मशील सावंत ।
वसंत ऋतूच्या आगमनाची चाहूल लागली आहे. आणि यादरम्यान अनेक झाडांची पानगळ सुरू झाली आहे. तर काही झाडांना रंगेबिरंगी कोवळी पाने फुटत आहेत. जंगल, गाव, शहरे व रस्त्याच्या दुतर्फा हे दृष्य अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.

रायगड जिल्ह्यात वनसंपदेचा अमूल्य ठेवा आहे. वेगवेगळ्या ऋतूत येथील वृक्षराजींचे अनोखे रूप पहायला मिळते. सध्या ऐन, सावर, साग, पांगारा आदी झाडांची पानगळ झाली आहे. तर करंज, जांभूळ, उंबर, पिंपळ व पळस आदी झाडांना नवीन कोवळी पालवी फुटत आहे. विशेष म्हणजे प्रत्येक झाडाची पालवी विविध लक्षवेधी आकार व गर्द पोपटी, लाल, हिरवा आदी आकर्षक रंगाने वैशिष्टपूर्ण आहे. सूर्याची किरणे या पानांवर पडल्यावर जणू काही पानांच्या रंगांची उधळण झाल्याप्रमाणे वाटते. त्यामुळे ही पाने येथील नागरिक व पर्यटक यांचे लक्ष वेधून घेते.

पानगळ झालेल्या झाडांमधून कोवळ्या पालवीचे मनमोहक धुमारे फुटलेले एखादे झाड दृष्टीक्षेपात पडले की अनेकांचे लक्ष वेधते. कित्येकांचे मन प्रसन्न करते. वाढत्या उष्म्यात ही कोवळी पालवी डोळ्यांना गारवा देते. तर या झाडाखाली आलेल्यांना शीतल सावली देते. व असंख्य पशुपक्ष्यांचे आश्रयस्थान बनते. कित्येक निसर्गप्रेमी व वनअभ्यासक या झाडांचे निरीक्षण करतांना दिसतात. अनेक हौशी लोक व पर्यटक आवर्जून कोवळी पालवीने बहरलेल्या झाडांचे छायाचित्र आवर्जून घेतात.

जिल्ह्यात विविध प्रकारच्या वनस्पती आढळतात. ऋतुमानानुसार त्यातील काहींची पानगळ होते, तर काहींना नवीन पालवी फुटते. हे चक्र वैशिष्ट्यपूर्ण व निसर्ग नियमाने सुरू आहे. ही वृक्षांच्या जीवनामधली एक अवस्था आहे. निरनिराळ्या भागात हा कालावधी वेगवेगळा आढळून येतो. नवी पालवी फुटलेले झाड हमखास लक्ष वेधून घेते. – अमित निंबाळकर, वनस्पती अभ्यासक

पानगळ झालेले वृक्ष
पळस, सावर, बहावा, गुलमोहर, पांगारा आदी काही झाडांना पानगळती झाल्यावर फुले येतात. पानगळ झालेली अशी झाडे पक्षी, कीटक वा काही सस्तन प्राण्यांकडून परागीभवन करून घेतात. पाने नसल्याने झाडांची फुले सहज दिसतात. पक्षी, कीटक फुलांकडे आकर्षित झाल्याने फुलांचे परागीकरण होते.

Exit mobile version