जिल्ह्यात ठिकठिकाणी बैठका घेऊन तयारी सुरू
| अलिबाग | प्रतिनिधी |
ग्रामपंचायत कर्मचारी त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी येत्या 20 नोव्हेंबरला राज्यव्यापी आंदोलन करणार आहेत. ग्रामविकासमंत्री गिरीष महाजन यांच्या जळगाव येथील जनसंपर्क कार्यालयावर बेमुदत धरणे आंदोलन केले जाणार आहे. त्याची तयारी रायगड जिल्ह्यात कर्मचाऱ्यांनी सुरु केली आहे. याबाबत रायगड जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघटनाचे अद्यक्ष मंगेश म्हात्रे, उपाध्यक्ष गोविंद म्हात्रे आदी पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
अभय यावलकर समितीच्या अहवालातील शिफारशी मान्य करा, लोकसंख्येचा सुधारित आकृतीबंध आणि वेतनश्रेणी ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांना त्वरीत लागू करा, कामगार विभागाच्या किमान वेतन समितीमार्फत कर्मचाऱ्यांच्या सुधारित वेतनाचे दर पुर्न:निर्धारित करा, कर्मचाऱ्यांच्या किमान वेतन अनुदानासाठी असलेली करवसुली व उत्पन्नाची जाचक अट रद्द करावी. वेतन व राहणीमान भत्त्यासह सरसकट शंभर टक्के लागू करावे, कर्मचाऱ्यांना पेन्शनचा कायदा लागू करावा, राज्यातील जिल्हा परिषदअंतर्गत रिक्त असलेल्या सर्व गट ‘क’ व ‘ड’च्या पदांची ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमधून 10 टक्के पदभरती तात्काळ करा, अशा अनेक मागण्यांसाठी हे आंदोलन केले जाणार आहे. आपल्या मागण्यांसाठी रायगड जिल्ह्यातूनदेखील कर्मचारी आंदोलनात सहभागी होणार आहेत. रायगड जिल्ह्यातून पाचशेहून अधिक कर्मचारी या आंदोलनात सहभागी होणार आहेत, अशी माहिती रायगड जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघटनाचे अध्यक्ष मंगेश म्हात्रे यांनी दिली.