| अलिबाग | शहर प्रतिनिधी |
गेल्या काही दिवसांपासून नागांव, आक्षी, रेवदंडा परिसरात बिबट्या असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. सर्व प्रथम नागांव येथील समीरा परिसरात रात्री एक ते दोन वाजण्याच्या सुमारास बिबट्या असल्याचे रात्रीपासून सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते. त्यानंतर शुक्रवारी रात्री (दि.27) रायवाडी समुद्र किनारी बिबट्या असल्याची चर्चा सुरू होती. तेथील स्थानिकांनी रात्रीच्या सुमारास बिबट्या बघितल्याचे खात्रीशीर सांगीतले होते. ग्रामस्थांसह वन अधिकाऱ्यांनी बिबट्याचा शोध घेतला असता बिबट्या असण्याचे काही पुरावे मिळाले नाहीत. त्यानंतर रविवारी सकाळी वन विभागाने आक्षी समुद्रकिनारी पाहणी केली. यावेळी त्यांना ठसे सापडले असून ते ठसे बिबट्याचे असण्याची शक्यता असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले होते. आक्षीबरोबरच थेरोंड्यामध्येदेखील बिबट्या फिरत असून त्याने एका घोड्याला जखमी केल्याची चर्चा पसरली होती.
यातच आता नागांव परिसरातील खारगल्ली येथील डोंगराळ भागात बिबट्याचा वावर असल्याची बातमी जोर धरू लागली आहे. सोमवारी दि.30 रोजी खारगल्ली येथील एका ग्रामस्थाचा एक बोकड बिबट्याने शिकार करून नेला असे त्याचे म्हणणे आहे. तसेच, रात्रीच्या वेळेस ग्रामस्थ व वन कर्मचारी यांनी बिबट्या बघिल्याचे खात्रीशीर सांगीतले. त्यावेळी अंधार असल्यामुळे बिबट्याला निटसे पाहु शकले नाहीत व त्याचे छायाचित्र ही काढता आलेले नाही. यानंतर वन अधिकाऱ्यांकडून कोणतीही शोध मोहीम करण्यात आलेली नाही.