। सुकेळी । वार्ताहर ।
जिल्ह्यामध्ये मार्च महिना सुरू झाल्यापासून सर्वच डोंगरांमध्ये वणव्यांचे प्रमाण हे दिवसेंदिवस फार मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे. वाकण, पाटणसई, सुकेळी,खांब, भिसे खिंडीतील डोंगरांमध्ये वणव्यांचे प्रमाण वाढत चालले असून याबाबतीत वनअधिकार्यांसह शासकीय प्रशासनाचे या बाबतीत दुर्लक्ष व निष्काळजीपणा होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
यावर्षी मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच वातावरणात मोठ्या प्रमाणात उष्णता वाढल्याचे जाणवत आहे. त्यातच वातावरणातील या वाढत्या उष्णतेमध्येच जिल्ह्यातील अनेक डोंगरांमध्ये वणवे लावल्यामुळे या लावलेल्या वणव्यात जंगलामध्ये सगळीकडेच पालापाचोळा आणी सुकलेल्या झांडाचा खच पडलेला असल्यामुळे वार्याच्या प्रचंड वेगाने आग सर्वत्र मोठ्या प्रमाणात पसरल्यामुळे या वणव्यात नैसर्गिक वनसंपत्तीचे मोठे नुकसान होत असून वन्य प्राण्यांना देखिल आपल्या जिवाला मुकावे लागत आहे. रोहा तालुक्यातील सुकेळी, वाकण,भिसे खिंड, खांब परिसरातील डोंगर हे जवळपास दोन ते तीन दिवसांपासून वणव्यांच्या भक्षस्थानी गेले आहेत. याच परिसरामध्ये वणव्यांचे प्रमाण वाढण्याचे नक्की कारण काय? अनेक प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहेत.
याबाबतीत वनखात्याच्या वरिष्ठ अधिकारी वर्गाने गांभिर्याने लक्ष घालून दिवसेंदिवस वाढत चाललेल्या वणव्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी निमिष वाघमारे यांनी केली आहे.