सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये ; रायगडसह सात जिल्ह्यांवर नजर

वाढणारी रुग्णसंख्या,डेल्टा प्लसचा वाढता प्रादुर्भाव
मुख्यंमत्र्यांकडून परिस्थितीचा आढावा
मुंबई | प्रतिनिधी |
दुसरी लाट अजून गेलेली नाही आणि त्यातून सावरून आपल्याला तिसर्‍या संभाव्य लाटेचा मुकाबला करायचा आहे, डेल्टा प्लेस या उत्परिवर्तित विषाणूचा देखील धोका आहे हे सगळे लक्षात ठेवून राज्य सरकार पुन्हा अ‍ॅक्शन मोडमध्ये आलेले आहे.घाईघाईने निर्बंध उठवू नका,धोका पत्करु नका,असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व जिल्हास्तरीय यंत्रणाना दिलेले आहेत.रायगडसह सात जिल्ह्यांवर सरकारने विशेष लक्ष केंद्रित केलेले आहे.

कोरोना संसर्ग वेगाने वाढत असलेल्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि हिंगोली या 7 जिल्ह्यांच्या जिल्हाधिकार्‍यांशी गुरुवारी ते दूरचित्र प्रणालीद्वारे बैठकीत बोलत होते. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची देखील उपस्थिती होती.


संसर्गाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन पुढील काळात किती जास्तीचे ऑक्सिजन व आयसीयू बेड्स लागतील तसेच फिल्ड रुग्णालयासारख्या किती सुविधा उभाराव्या लागतील याविषयी आरोग्य विभागाने सर्व जिल्ह्यांना नियोजन करून द्यावे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


सातही जिल्ह्यात चाचण्यांची संख्या वाढवावी लागेल. या विषाणूची लक्षणेही बदलत आहेत. लसीकरणाविषयी नागरिकांच्या मनातील भ्रामक कल्पना व समजुती काढून घेऊन त्यांना लसीकरणासाठी प्रवृत्त करणे खूप आवश्यक आहे. प्रसंगी अधिक कडक निर्बंधही लावावे लागणार आहेत
डॉ संजय ओक,टास्क फोर्स प्रमुख


निर्बंध पुन्हा वाढणार
सध्याच्या निर्बंध शिथिलीकरणाच्या पंचस्तरीय पद्धतीत बदल करण्यात येणार असून हे निकष अधिक कठोर करण्यात येणार आहेत. गर्दी टाळण्यासाठी नियम अधिक कठोर करून अत्यावश्यक वगळता इतर दुकानांच्या वेळाही कमी करण्यात येण्याची शक्यता आहे. येत्या दोन दिवसांत याबाबतची नियमावली जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

घाईघाईने व्यवहार खुले करू नका
मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, दुसर्‍या लाटेचे शेपूट अजून बाकी आहे. आपण पूर्णपणे त्यातून बाहेर आलेलो नाही. जिल्ह्यांसाठी विविध निर्बंधांच्या पातळ्या ( लेव्हल्स) ठरविल्या असल्या तरी स्थानिक प्रशासनाने प्रत्यक्ष परिस्थिती पाहून आणि कुठलाही धोका न पत्करता निर्बंधांबाबत निर्णय घ्यायचा आहे. लेव्हल्सचा आधार घेऊन नागरिक मुक्तपणे आरोग्याचे नियम न पाळता सर्व व्यवहार करणार असतील आणि गर्दी करणार असतील तर संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढून परिस्थिती बिघडू शकते. यादृष्टीने आपल्या शहर अथवा जिल्ह्यातील संसर्गाचा नीट अभ्यास करा आणि घाईघाईने व्यवहार खुले करू नका असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की,विशेषतः: दुसर्‍या लाटेत आपण ऑक्सिजनच्या कमतरतेचा अनुभव घेतला आहे. आणि म्हणूनच सर्व जिल्ह्यांनी ऑक्सिजनचा पुरेसा साठा आत्तापासून करून ठेवा. दुर्गम आणि ग्रामीण भागात औषधी व इतर आवश्यक वैद्यकीय सामुग्री उपलब्ध राहील हे पहा. आपल्याला बर्‍याच ठिकाणी फाईल्स रुग्णालयांसारख्या सुविधा उभारता येतील त्यासाठी इमारती व जागांचे नियोजन करून ठेवा.

प्रारंभी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी बोलताना सांगितले की राज्यातील या 7 जिल्ह्यांमधील परिस्थिती चिंतेचा विषय बनू शकते. यातील 3 जिल्हे कोकण, 3 पश्‍चिम महाराष्ट्र आणि एक मराठवाड्यातील जिल्हा आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणावर चाचणी, तसेच ट्रेसिंग व लसीकरण करण्यावर भर दिला जाईल तसेच या जिल्ह्याना यासंदर्भात आवश्यक त्या सुविधाही पुरविण्यात येतील असे सांगितले. आर चाचणी वाढविणे, वाड्यावस्त्यांमध्ये कंटेनमेंट उपाययोजना अधिक काटेकोरपणे राबविणे याकडे सर्वानीच लक्ष द्यावे असे मुख्य सचिव म्हणाले.

याप्रसंगी जिल्हाधिकार्‍यांनी त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यात करीत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली तसेच फिरत्या प्रयोगशाळा पुरविण्याची विनंती केली तसेच गावोगावी कोरोनमुक्तीसाठी करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. प्रारंभी आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी या सातही जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. राज्याचा पॉझिटिव्हिटी दर 0. 15 इतका कमी झाला आहे मात्र या सातही जिल्ह्यांचा दर त्यापेक्षा दुप्पट-तिप्पट आहे असे सांगितले. रत्नागिरीत पहिल्या लाटेत 3074 रुग्ण तर दुसर्‍या लाटेत 5600 रुग्ण, सिंधुदुर्गात पहिल्या लाटेत 1346 तर सध्या 5500 , हिंगोलीत पहिल्या लाटेत 660 तर दुसर्‍या लाटेत 675 रुग्ण आढळले असून ही वाढ सावध करणारी आहे असे ते म्हणाले.

निर्बंध शिथिलीकरणानंतर जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच राज्यात कोरोनाच्या उत्परिवर्तित विषाणूचे (डेल्टा प्लस) 21 रुग्ण आढळून आले. या विषाणूचा संसर्ग वाढण्याचा धोक्याचा इशारा कें द्र सरकारने दिल्यामुळे राज्य सरकाची चिंता वाढली आहे. त्यामुळे हा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.

Exit mobile version