पाणी पुरवठा वाढवण्यासाठी होणार सहाय्य
। बोर्लीपंचतन । वार्ताहर ।
सुमारे तीस वर्षांनंतरही कोंढे धरणाच्या बंधार्याचं बांधकाम सुस्थितीत आहे. या सर्व गोष्टींचा भविष्याच्या दृष्टीनं विचार करुन केंद्र शासनाच्या जलशक्ती अभियानांतर्गत या धरणावर पाणलोट क्षेत्र विकास योजना राबविण्यासाठी बोर्लीपंचतन ग्रामपंचायतीकडून संबधीत विभागाकडे तसा प्रस्ताव पाठवायला हवा. पावसाळ्यापुर्वी कोंढे पंचतन धरणातील गाळ, माती, दगड-गोटे काढण्याबरोबरच शक्य होत असेल तर पाणलोट क्षेत्राची रुंदी वाढवून धरणाची पाणी साठवण क्षमता वाढवता येईल का? याचा गांभीर्याने विचार होणं गरजेचं आहे.
1995 साली युती शासनाच्या कार्यकाळात झालेल्या या धरणाचं कार्यक्षेत्र अतिशय नैसर्गिक व पूर्णपणे माती, दगड गोट्यांच्या डोंगरातील आहे. धरणाचं पाणलोट क्षेत्र लहान असुन पावसाळ्यात धरणात पाणी जमा होताना पाण्याबरोबर माती, दगड, गोटे मोठ्या प्रमाणात वाहून येतात. त्याचा परिणाम पाणी साठ्यावर होत असून उभारणी केल्यापासून धरणातला गाळ काढला नसल्याने दरवर्षी पाणी साठवण क्षेत्र कमी होत आहे.
या धरणाच्या पाणलोट क्षेत्राची रुंदी वाढवून त्यातील गाळ, दगड, गोटे, माती काढल्यास पाण्याची साठवण क्षमता किती वाढवता येईल? आत्ताची साठवण क्षमता आणि पाणलोट क्षेत्राची रुंदी वाढविल्यानंतर वाढीव पाण्याचा दाब बंधारा पेलवू शकेल का? या तांत्रिक बाबींंची तपासणी करुन शक्य होत असेल तर बोर्लीपंचतन गावाची वाढती लोकसंख्या व वेगाने होणारा विस्तार पाहता पाणी साठवण क्षेत्राची रुंदी वाढविल्यास जादा जमा झालेल्या पाण्यामुळे आणखी दिड-दोन महिने तरी पाणी पुरवठा वाढणार आहे.
याचा सकारात्मक परिणाम लघु पाटबंधारे विभागाच्या कार्ले धरणावर होऊन तेथील थोडाफार पाणीसाठा राखीव राहून दिवसेंदिवस पावसाच्या कमी होत असलेल्या प्रमाणामुळे त्याचा वापर ऐनवेळी पाणीटंचाईच्या काळात होऊ शकतो. त्याचबरोबर बोर्लीपंचतन ग्रामपंचायतीच्या दोन तीन महिन्यांच्या वीज बिलाच्या खर्चाचीसुध्दा बचत होऊ शकते.