इंग्लंडचा हिशोब चुकता

भारताचा 106 धावांनी विजय, बुमराह-अश्विनचा प्रभावी मारा; मालिकेत 1-1 अशी बरोबरी

| विशाखापट्टणम | वृत्तसंस्था |

भारताने दुसऱ्या कसोटीत इंग्लंडला 106 धावांनी लोळवून 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. भारताकडून दुसऱ्या डावातही जसप्रीत बुमराह आणि आर अश्विनने भेदक गोलंदाजी करत, इंग्लंडच्या फलंदाजाना गुंडाळण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली. दुसऱ्या डावात बुमराह आणि अश्विनने प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या. त्यामुळे भारताच्या 399 धावांचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडचा दुसऱा डाव 292 धावांवर आटोपला. त्यामुळे भारताने चौथ्या दिवशीच ही कसोटी आपल्या खिशात टाकली.

दुसऱ्या कसोटी सामन्यात विजयासाठी इंग्लंडसमोर 399 धावांचे आव्हान होते. मात्र, त्यांचा दुसरा डाव 292 धावांवर आटोपला. इंग्लंडकडून जॅक क्रॉलीने सर्वाधिक 73 धावांची खेळी साकारली. यामध्ये 8 चौकार आणि एक षटकाराचा समावेश होता. त्याशिवाय एकही इंग्लिश फलंदाज मोठी खेळी साकारण्यास अपयशी ठरला. भारताकडून जसप्रीत बुमराह याने या कसोटीत 9 विकेट्स घेतले. पहिल्या डावात त्याने 6 गडी बाद केले. तर, दुसऱ्या डावात तीन गडी बाद केले. रविचंद्रन अश्विनने दुसऱ्या डावात 3 गडी बाद करत बुमराहाला चांगली साथ दिली.

भारताने या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकत पहिली फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात भारतीय संघाने 396 धावा केल्या. यामध्ये सलामीचा फलंदाज यशस्वी जैयस्वाल याने आपल्या कसोटी कारकीर्दीतील पहिले द्विशतक झळकवताना 209 धावांची खेळी साकारली. या खेळीत त्याने 19 चौकार आणि 7 षटकार लगावले. त्यानंतर इंग्लंडने पहिल्या डावात 253 धावा केल्या. बुमराहने भेदक मारा करत सहा विकेट्स घेतल्या. त्यानंतर टीन इंडियाचा दुसरा डाव 255 धावांत आटोपला. इंग्लंडला विजयासाठी 399 धावांचे आव्हान दिले. मात्र, त्यांना हे आव्हान पेलवले नाही. पहिल्या कसोटीत आघाडी घेऊनही सामना गमावण्याची नामुष्की पहिल्या कसोटीत भारतीय संघावर ओढावली होती. त्यामुळे दुसऱ्या कसोटी सामन्यातील कामगिरीकडे क्रिकेट चाहत्यांच्या नजरा खिळल्या होत्या.

Exit mobile version