| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. मात्र, यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानने थेट नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करून गोळीबाराला सुरुवात केली. पाकिस्तानने हवाई हल्ल्याचेही प्रयत्न केले. पण भारतीय रडार यंत्रणांनी ते हाणून पाडले. दरम्यान, भारताने थेट पाकिस्तानच्या हवाई सुरक्षा यंत्रणेवरच स्ट्राइक केला. लाहोरमधील हवाई सुरक्षा यंत्रणा उद्ध्वस्त केल्याची माहिती भारताने दिली.
भारताने ऑपरेशन सिंदूर हे फक्त दहशतवादी तळांवर हल्ल्यापुरतं मर्यादीत असल्याचे पहिल्यांदा घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले होते. या हल्ल्यात कोणत्याही पाकिस्तानी संस्था किंवा लष्कराला टार्गेट केले नव्हतं असे स्पष्ट केले होते. भारतात लष्करी हल्ला केल्यास त्याला चोख प्रत्युत्तर दिले जाईल असा इशारा आता भारताने दिला होता. दरम्यान, भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर गुरुवारी पहाटेपर्यंत पाकिस्तानकडून भारतात अनेक ठिकाणी हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. याला भारताने चोख प्रत्युत्तर दिलं.
पाकिस्तानने ड्रोन आणि क्षेपणास्त्रांद्वारे अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथाला, जालंधर, लुधियाना, आदमपूर, भटिंडा, चंढिगड, नल, भूज यासह उत्तर आणि पश्चिम भारतातील अनेक लष्करी तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हे हल्ले यूएएस ग्रिड आणि हवाई संरक्षण यंत्रणेनं निष्क्रिय केले. पाकिस्तानच्या या हल्ल्यांचे अवशेष अनेक ठिकाणी सापडत आहेत. पाकिस्तानी लष्कराने भारताच्या भूमिकेचा आदर केला तर भारतही संयम राखेल अशा शब्दात भारताकडून पाकिस्तानला समज देण्यात आली. भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानमधील अनेक ठिकाणी हवाई संरक्षण रडार आणि यंत्रणेला टार्गेट केलं. पाकिस्तानने ज्या पद्धतीने हल्ल्याचा प्रयत्न केला त्याच पद्धतीने जशास तसं उत्तर भारताने दिलं. सकाळी भारताने लाहोरमधील पाकिस्तानची हवाई संरक्षण प्रणाली निष्क्रिय केली. जम्मू आणि काश्मीरमधील कुपवाडा, बारामुल्ला, उरी, पूंछ, राजौरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर पाकिस्तानने अनेक हल्ले केले. पाकिस्तानी लष्कराकडून केलेल्या गोळीबारात 3 महिला आणि 5 मुलांसह 16 निष्पाप लोकांचे प्राण गेले आहेत.