। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
लोककलावंतांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्याचा उपक्रम कौतुकास्पद आहे. कोरोनाकाळात पत्रकारांनी महत्त्वाची भूमिका बाजवली आहे. पत्रकारिता करतानाच सामाजिक बांधिलकी जपत पत्रकारांनी लोककलावंताना मदत करण्याचा केलेला प्रयत्न प्रोत्साहन देणार ठरेल, असे प्रतिपादन रत्नागिरी शहर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक अनिल लाड यांनी केले.
आधार प्रतिष्ठान आयोजित पत्रकार आणि मित्र व पल्लवी फाउंडेशनच्या विद्यमाने रत्नागिरीतील 300 गरजू लोककलावंताना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार सतीश कामत, संदीप तावडे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र चव्हाण, सचिव राजेश कळंबटे, पत्रकार विजय पाडावे, राकेश गुडेकर,तन्मय दाते, गुरुप्रसाद सावंत, गणेश भिंगार्डे, सूरजआयरे उपस्थित होते. देशासह परदेशातील पर्यटक येथे येतात. गावेगावच्या लोककलावंतांनी ही कला जिवंत ठेवली आहे. गेली दोन वर्ष कोरोनाच्या महामारीमुळे प्रत्येकजण अडचणीत आहे. आपले लोककलावंत शेतकरी, शेती करून कुटुंब चालवतात. त्यातूनच आपली लोककला जिवंत ठेवतात. त्यांना खारीचा वाटा म्हणून मदत करण्यासाठी मुंबईतील पत्रकार व मित्र, पल्लवी फाउंडेशन पुढे आले आहे. राज्यातील गरजू लोककलावंताना मदत करण्याचा त्यांनी निर्णय घेतला.यावेळी जाखडी, नमन मंडळाच्या प्रतिनिधींना प्रातिनिधिक स्वरूपात पोलीस निरीक्षक अनिल लाड यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी सोमेश्वर नाट्य नमन मंडळ वांद्री, संगमेश्वरी बाज आदी मंडळाच्या प्रतिनिधींना साहित्याचे वाटप करण्यात आले.