150 व्या वर्षपूर्तीनिमित्त क्रिकेट ऑस्ट्रेलियाची भव्य योजना
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
प्रसिद्ध टी-20 स्पर्धा बिग बॅश लीग भारतात आयोजित करण्याच्या निर्णयानंतर, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आता एक अत्यंत धाडसी आणि ऐतिहासिक पाऊल उचलण्याचे संकेत दिले आहेत. क्रिकेट जगतातील सर्वात जुनी आणि प्रतिष्ठित मानली जाणारी ॲशेस कसोटी स्पर्धा भविष्यात भारतात आयोजित करण्याचा मानस क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा असल्याचे समोर आले आहे. सीएचे टॉड ग्रीनबर्ग यांनी या शक्यतेचा पुनरुच्चार करताना, जागतिक क्रिकेटमध्ये भारतीय क्रीडा बाजारपेठेचे वाढते अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित केले आहे.
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात पुढील वर्षी मार्च महिन्यात ऐतिहासिक पहिल्या कसोटी सामन्याच्या 150 व्या वर्धापनदिनानिमित्त विशेष कसोटी सामना खेळवला जाणार आहे. सध्याच्या नियोजनानुसार हा सामना ऑस्ट्रेलियाच्या बाहेर आयोजित करण्याचा कोणताही थेट प्रस्ताव नसला, तरी भविष्यात भारतात असा ऐतिहासिक सामना आयोजित करण्याच्या पर्यायाचा गांभीर्याने विचार केला जाऊ शकतो, असे ग्रीनबर्ग यांनी स्पष्ट केले.
क्रिकेट ऑस्ट्रेलिया सध्या भारतीय प्रेक्षक आणि बाजारपेठेपर्यंत पोहोचण्यासाठी वेगाने पावले उचलत आहे. याच रणनीतीचा भाग म्हणून यंदाच्या डिसेंबर महिन्यात बिग बॅश लीगचा एक सामना चेन्नई येथे खेळवला जाणार आहे. या लढतीत मेलबर्न रेनेगेड्स आणि पर्थ स्कॉचर्स हे दोन तगडे संघ आमनेसामने असतील. ऑस्ट्रेलियन क्रिकेटला भारतीय चाहत्यांच्या अधिक जवळ आणण्याच्या दृष्टीने हा एक ऐतिहासिक टप्पा मानला जात आहे.
भारतात ॲशेस कसोटीच्या आयोजनाची शक्यता ही देशातील क्रिकेट बाजारपेठेची प्रचंड व्यावसायिक ताकद दर्शवते. भारत हा सध्या जगभरात क्रिकेटचा सर्वात मोठा प्रेक्षकवर्ग असलेला देश आहे.
अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमधील महामुकाबला भारताच्या भूमीवर आयोजित केल्यास, त्यातून क्रीडारसिकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण होईलच, शिवाय मोठ्या व्यावसायिक संधींचे नवे दरवाजेही उघडतील.
ग्रीनबर्ग यांनी स्पष्ट केले की क्रिकेट ऑस्ट्रेलिया या कल्पनेला पूर्णपणे नकार देणार नाही. यासाठी त्यांनी इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्ड आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ यांच्यासोबत असलेल्या मजबूत व्यावसायिक व मैत्रीपूर्ण संबंधांचा हवाला दिला.
बीबीसीच्या स्टंप्ड या पॉडकास्टशी बोलताना ग्रीनबर्ग म्हणाले, इंग्लंड आणि भारत या दोन्ही क्रिकेट बोर्डांशी आमचे संबंध अत्यंत सौहार्दाचे आहेत. भारतीय बाजारपेठेत अधिक क्रिकेट सामने सादर करण्यासाठी मोठ्या संधी उपलब्ध आहेत, यात शंका नाही. सध्या आम्ही असा कोणताही सामना तातडीने आयोजित करण्याचे नियोजन करत नसलो, तरी भविष्यात यावर नक्कीच विचार केला जाईल.
जगातील इतर भागांतील क्रिकेटच्या कलापेक्षा ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि भारत यांच्यातील कसोटी क्रिकेट आजच्या घडीलाही अत्यंत लोकप्रिय आणि मजबूत स्थितीत आहे. म्हणूनच ही परंपरा अधिक समृद्ध करणे आणि वाढवणे हे आमचे ध्येय आहे.
कॅलेंडरमधील मर्यादित वेळेबाबत बोलताना ते पुढे म्हणाले, जागतिक क्रिकेटसमोरील सर्वात मोठे आव्हान म्हणजे वर्षातील 365 दिवसांचे मर्यादित वेळापत्रक. आपल्याला ज्या प्रकारचे दर्जेदार सामने आयोजित करायचे आहेत, त्यासाठी कदाचित वर्षात आणखी एक-दोन महिन्यांची गरज भासेल.
150 वर्षांची ऐतिहासिक परंपरा
ॲशेस ही क्रिकेट इतिहासातील सर्वात जुनी आणि रोमांचक स्पर्धा मानली जाते, ज्याची सुरुवात 1877 मध्ये झाली होती. दरम्यान, 2027 मध्ये खेळल्या जाणाऱ्या पुरुष आणि महिला ॲशेस मालिकेचे नवे वेळापत्रक नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. या दोन्ही मालिका इंग्लंडच्या भूमीवर एकाच वेळी खेळवल्या जाणार आहेत. यासोबतच, क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच मिक्स डिझॅबिलिटी ॲशेस (दिव्यांग ॲशेस) मालिकेचे आयोजनही याच काळात होणार आहे.







