प्रतिक कोळी
भारतात विशेषतः महाराष्ट्रातील प्रमुख दैवते आणि संप्रदायापैकी दत्तात्रेय दैवत आणि संप्रदायास महत्त्वाचे स्थान आहे. मध्ययुगीन काळात स्थापन झालेल्या दत्तसंप्रदायाचे उपास्य दैवत असणारे दत्तात्रेय. एक महान योगी म्हणून दत्तात्रेयास नाथ, महानुभाव पंथ, आद्य ग्रंथ लीळाचरित्र, दत्त संप्रदाय, तांत्रिक इत्यादी संप्रदायांत त्याचे स्थान असून, ही योगसिद्धी प्राप्त करून देणारी देवता आहे, अशी मान्यता आहे. तसेच हे दैवत वारकर्यांनाही पूज्य असून, संत ज्ञानदेव आणि संत एकनाथ हे दत्तोपासक असल्याचे दाखले त्यांच्या इतिहासातून मिळतात.
या दैवतेचा उल्लेख इसवी सनाच्या सुमारे पाचव्या शतकापासून पुराण वाङ्मयात आढळतो. हिंदू पौराणिक साहित्यानुसार, अत्रि ऋषींची पत्नी माता अनूसया हिचे पुत्र दत्त, सोम व दुर्वास हे तिघे विष्णू, ब्रह्मा व शिव यांचे अवतार मानले जातात. पूर्वकाळात विष्णूचा अवतार मानल्या गेलेल्या दत्ताचे स्वरूप उत्तरकाळात ब्रह्मा, विष्णु व महेश या तिन्ही देवांचे अंशरूप सामावून घेत त्रिमुखी रूपात उत्क्रमत गेले.
दत्तात्रेयांचा उल्लेख त्याचे साधक, परंपरेने गुरुदेव असाच करतात. या गुरुदेव दत्तात्रेयांचे एकूण 24 गुरु होते. मात्र या गुरुस्थानी सिद्धयोगी व्यक्तींचा स्वीकार केला नव्हता. तर त्याऐवजी निसर्गाचे अधिष्ठान स्वीकारण्यात आले होते. निसर्गातील एकूण 24 घटक असे त्यांचे 24 गुरु असून, त्यांच्या अंगी निसर्गतः असलेल्या गुणधर्माच्या आधारे एखादी व्यक्ती आपले लक्ष कसे प्राप्त करु शकते, याचा अन्वयार्थ दडलेला आहे. अर्थातच अध्यात्माच्या आधारावर हे चोवीस गुरु अधिष्ठित करण्यात आले असले तरीही, यामागील भूमिकेचा फायदा सर्वसामान्य व्यक्तीला त्याच्या नैतिक जीवनात इतके नक्की.
श्रीमद्भगवत या ग्रंथाच्या अकराव्या स्कंधात यदु आणि अवधूत यांचा संवाद आहे. यामध्ये चोवीस गुरुंचा उल्लेख आढळतो. या संवादात अवधूत सांगतात की, जगातील प्रत्येक गोष्ट गुरु आहे. चांगले किंवा वाईट अशा पातळीवर शिकताना वाईट गोष्टींपासून कोणते दुर्गुण सोडायचे आणि चांगल्या गोष्टींपासून कोणते सद्गुण घ्यायचे, हे शिकता मिळते. प्रकृतीमधील चोवीस गुरूंपासून थोडे थोडे ज्ञान घेऊन मी त्याचा समुद्र बनवला आणि त्यात स्वतः स्नान करून सर्व पापांचे क्षालन केले.
दत्तात्रेयांच्या या चोवीस गुरूपैकी सर्वप्रथम पृथ्वी किंवा जमिन आहे. कोणत्याही परिस्थितीत व्यक्तीने सहनशील तथा सहिष्णू असण्याचा गुण या घटकापासून शिकण्याचा आग्रह करण्यात आला आहे. यानंतर वायू या घटकाचा समावेश करण्यात आला असून, सतत वाहणे म्हणजे आपल्या कर्तव्यांची पूर्ती आसक्ती न ठेवता करणे, असा यामागील विचार आहे.
पुढील घटक हा आकाश असून, अचलता हा मुळ गुणधर्म प्रधान मानला गेला आहे. या आकाशासमानाच व्यक्तीचे वर्तन निर्विकार, एक, सर्वांशी समत्व राखणारा पण निःसंग असा, अभेद, निर्मळ, निर्वैर, अलिप्त असण्याची अपेक्षा येथे करण्यात आली आहे. यानंतर पाणी या घटकाचा विचार सर्वांसोबतच समान स्नेहभाव किंवा सख्यत्व या भावनेने अंतर्भूत करण्यात आला आहे. ज्याप्रमाणे प्राणी कोणताच पक्षपात न करता सर्वच प्राणीमात्रांची तहान भागवते त्याप्रमाणेच व्यक्तीने आपल्या भूमिकेत किंवा कर्तव्यात पक्षपातीपणा करु नये. तर यापुढील घटक अग्नी असून, व्यक्तीने अग्नीप्रमाणे तप करून स्वयंप्रकाशित व्हावे आणि कोणत्याही दोषांचे आचरण न करता आपले गुण कार्यकारणप्रसंगीच योग्य ठिकाणी वापरावे.
यापुढील घटक अनुक्रमे चंद्र आणि सूर्य असून, त्याला भागवतधर्मातील अध्यात्म्याची विशेष किनार आहे. चंद्र ज्याप्रमाणे कलेकलेने कमी होतो किंवा वाढतो तसेच मानवी जीवन आहे. सुखामागून दुःख आणि दुःखामागून सुख हे चक्र सुरुच राहते. पण म्हणून जगण्याचा त्याग करणे, योग्य नाही. तसेच सूर्य भविष्यकालाचा विचार करून जलाचा संचय करतो आणि योग्य काळी परोपकारार्थ त्याचा भूमीवर वर्षाव करतो. त्याप्रमाणे व्यक्तीने उपयुक्त वस्तूंचा संचय करून, देश, काल, वर्तमानस्थिती लक्षात आणून निष्पक्षपातीपणाने सर्वांस त्यांचा अभिमानरहित लाभ द्यावा.
यानंतर कपोत म्हणजे कबुतर याचा दाखला देताना अवधूत सांगतात की, बहिरीससाणा कबुतराला परिवारासहित भक्षण करतो. कारण कबुतर म्हणजे व्यक्ती आपल्या प्रियजनांमध्ये अधिकच गुंतलेला असतो. यामुळे सख्यत्व जरी राखले तरीही त्याला मर्यादा असणे आवश्यक आहे. तर जीवनात येतील ते प्रसंग निमूटपणे स्वीकारुन क्रियाशील राहताना ठेविले अनंते तैसेचि रहावे। चिंती वसू द्यावे समाधान ॥ अशा वृत्तीने जगण्याची सूचना अजगर या घटकाचा दाखला देत अवधूत करीत आहेत.
तर समुद्र या घटकांचा दाखला देत व्यक्तीने स्वधर्माधीन राहून सुखोपभोगांचा लाभ झाल्याने सुखी होऊ नये किंवा दुःखपरंपरा कोसळल्याने दुःखी होऊ नये, सदैव आनंदभरित असण्याची शिकवण सांगण्यात आली आहे. हे सांगताना ते मोहापासून दुर राहण्यासाठी पतंग या घटकाचा दाखला देतात. पतंग ज्याप्रमाणे अग्नी म्हणजे मोहाकडे आकर्षित होवून स्वतःचा नाश करतो, तसे न करता व्यक्तीने मोहाकडे दुर्लक्ष करणे आवश्यक आहे. हे करताना मधमाशीचे उदाहरण पुढील घटक म्हणून देतात.
मध जमा करणारे मधुहा अचानक येऊन, तिचा प्राण घेऊन पोळ्यासह मध घेऊन जातात. धनसंचय केल्यामुळे अचानक मरणाची प्राप्ती होते, हा उपदेश मधमाशीपासून घेऊन द्रव्यसंचय करण्याचे सोडून द्यावे, ही सूचना येथे करण्यात आली आहे. तर हत्ती बलवान असला, तरी त्यास वश करण्यासाठी माणसे सापळा रचतात. आणि त्यामुळे सहजतेने तो कैदेत सापडतो. त्याप्रमाणे व्यक्ती गोड वृत्तीला मोहीत होत त्वरित बंधनात अडकतो. त्याचप्रमाणे भ्रमर म्हणजे भुंगा हा देखील सूर्यविकासी कमळाच्या पोटात संध्याकाळनंतर आसक्तीमुळे अडकून पडतो. म्हणून आसक्ती न बाळगता कर्माचा सल्ला इथे अवधूत मधमाशी, हत्ती आणि भुंगा या गुरुंच्या आधारे देतात.
तसेच अनुक्रमे हरिण आणि मासा या घटकांच्या आधारे मोहापासून दूर राहण्याची शिकवण येथे अभिप्रेत आहे. तर पिंगला नामक वेश्येचे दाखला देताना अतिआशाभाव सोडला की समाधानाची प्राप्ती होते, म्हणून आशेचा त्याग करण्याची शिकवण अवधूत देतात. याप्रमाणेच उपाधीरहित जगण्याचा सल्ला देताना ते टिटवीचे उदाहरण देतात.
टिटवी चोचीत मासा धरून चालली आहे, हे पाहून शेकडो कावळे आणि घारी तिच्या मागे लागले आणि तिला टोचा मारून, हतबल करून तो मासा हिसकावून घेण्याचा प्रयत्न करू लागले. ती जिथे जिथे जाई, तिथे तिथे हे सैन्य तिचा पाठलाग करी. शेवटी ‘दे माय धरणी ठाय’ होऊन तिने एकदाचा तो मासा टाकून दिला. तोच एका घारीने त्याला पकडले. हे बघण्याचाच उशीर, टिटवीला सोडून सारे कावळे आणि घारी त्या मासा उचलणार्या घारीचा पिच्छा पुरवू लागले. त्यामुळे ती टिटवी निश्चिंत होऊन एका झाडाच्या फांदीवर जाऊन शांतपणे बसली. या संसारात उपाधी झुगारून देण्यातच शांती आहे, हा गुण टिटवीच्या या भूमिकेत असल्याचा निष्कर्ष दत्तात्रेयांनी विशद केला आहे.
यापुढे आनंदी राहण्यासाठी व्यक्तीने मानापमानाचा विचार न करता जगताना अधिक चिंता न करत बालकाप्रमाणे राहत आनंद उपभोगण्याचा सल्ला ते बाळ या घटकाच्या आधारे देतात. तर नाहक वाद टाळून आपण आपल्या आत्मोद्धाराकडे लक्ष देण्यासाठी बांगड्यांचा दाखला देतात. ज्याप्रमाणे दोन बांगड्या एकावर एक आपटून त्यांचा आवाज होतो. तसेच वाद दोन व्यक्तींमध्ये किंवा अनेक व्यक्तींमध्ये होतो. पण याने मनःशांती लोप पावते. काहीच मिळत नाही. यामुळे अकारण वाद न करता आपण आपला विकास साधावा.
हा विकास साधताना आपली भूमिका कशी असावे याचे उदाहरण ते पुढील घटकाद्वारे देतात. एके दिवशी एक कारागीर एकाग्र चित्ताने बाणाचे पाते सिद्ध करत बसला होता. त्याच्याजवळून राजाची स्वारी वाजतगाजत थाटात गेली. मागाहून एक मनुष्य आला आणि त्याने त्याला विचारले, “या वाटेने राजाची स्वारी गेली, तिचे तुम्ही अवलोकन केले काय?’’ त्यावर कारागीर उत्तरला, “मी आपल्या कामात गर्क असल्यामुळे मला ते कळले नाही.’’ या कारागिराप्रमाणे आपण आपल्या कामाशी प्रामाणिक असणे आवश्यक आहे.
साप या घटकाचा दाखला देत गुरुदेव सांगतात की, साप ज्याप्रमाणे जोडीने कधीही फिरत नाही, अकारण कोणावर रागवित नाही, त्याप्रमाणे दोन बुद्धीमंतांनी कधी एकत्र फिरू नये, परिमित भाषण करावे, कोणाशी भांडण-तंटा करू नये, विचाराने वागावे. तर कोळी या घटकाच्या आधारे कोळी आपल्या नाभीतून तंतू काढून त्यांचे घर बनवतो आणि त्यात अहोरात्र क्रीडा करतो. पुढे मनास वाटेल, तेव्हा पुन्हा त्या घरास गिळून कोळी स्वतंत्र होतो. असेच खेळ जगात सुरु असतात. पण हे क्षणीक असल्याने जगातील घटनांना अतिरिक्त महत्त्व देण्यास टाळण्याची शिकवण देतात. आणि अखेर कुंभारमाशीचा दाखला देत जसा विचार तसा आचार ही शिकवण देताना शुद्ध कर्माचे म्हणजेच सदाचाराचे आचरण करण्याची शिकवण देतात.
सारांशाने, गुरुदेव दत्तात्रेय सहनशील-सहिष्णू वृत्ती, निर्विकार, पक्षपाती भूमिका, मोह-आसक्ती-उपाधी यांचा त्याग, प्रमाणशीर-संयतशीर जीवन असाच अन्वयार्थ दत्तात्रेयांच्या या चोवीस गुरुद्वारे विशद होत आहे.