पेंढा भरलेला वाघ, हा खरा वाघ नसतो
| रायगड | प्रतिनिधी |
वाघाचा कालभूत दिसे वाघा ऐसा| परि नाहीं दशा साच अंगी॥ सिकवलें तैसें नाचावे माकडें| न चले त्यापुढें युक्ति कांही॥
पेंढा भरलेला वाघ, हा वाघासारखा दिसतो, त्याने तो काही खरा वाघ होत नाही. जसे शिकवले आहे, तसे माकडाने नाचावे यापलीकडे त्याची बुद्धी चालत नाही. या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी फार मोठे सत्य जगापुढे ठेवले आहे. तात्पर्य हेच आहे की, काही दिवसांपूर्वी शेकापने पीएनपी चषकाचे यशस्वी आयोजन केले होते. रायगड जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात न भूतो, न भविष्यती अशी संकल्पना शेकापच्या महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी मांडली. त्याचे अनुकरण आता जिल्ह्यातील काही राजकीय पुढारी करत आहेत. मात्र, त्यांना शेकापने निर्माण केलेल्या ब्रॅण्डची स्पर्धा करणे थोडे अवघड असल्याचा सूर क्रीडाक्षेत्रात उमटत आहे.
शेकापने नेहमीच कला, सांस्कृतिक, क्रीडा, शिक्षण, उद्योग, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात भरीव असे योगदान दिले आहे. काहीच दिवसांपूर्वी शेकापने पीएनपी चषकाचे आयोजन केले होते. त्या माध्यमातून क्रिकेट खेळाडूंना फार मोठी संधी निर्माण झाली होती. या स्पर्धेमध्ये लाखोंच्या बक्षिसांची लयलूट होती. त्यामध्ये खेळाडू चांगलेच मालामाल झाले. या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे, नीटनेटके नियोजन होय. शेकापच्या सर्वच घटकाने यासाठी फार मोठी मेहनत घेतली होती.
शेकापने नेहमीच नवीन पायंडा पाडला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने दहीहंडी उत्सव, हळदीकुंकू, सायकल वाटप, गणेशोत्सव सजावट स्पर्धा, आरोग्य शिबीर, मोफत चष्मे वाटप यांचा समावेश आहे. आजच्या घडीला सर्व संकल्पना या शेकापच्या ब्रॅण्ड झाल्या आहेत. त्याचे अनुकरण आता अन्य राजकारणी त्यांच्या राजकीय फायद्यासाठी करत असल्याचे चित्र आहे. पीएनपी चषक क्रिकेट स्पर्धेतील विजेत्यांसाठी शेकापने लाखो रुपयांची बक्षिसे दिली होती. शेकाप किती रुपयांची बक्षिसे देणार आहे, याची काहीजण वाट पाहात होते. काही राजकारण्यांनी आयोजित केलेल्या स्पर्धेत शेकापच्या वरचढ अधिक रकमेचे बक्षीस देण्याचा अट्टाहास काहींनी केला आहे. त्यांनी बक्षिसांची रक्कम वाढवली असली, तरी शेकापसारखे नियोजन त्यांना जमणार आहे का, शेकापसारखी लोकप्रियता, विश्वासार्हता त्यांना मिळणार आहे का, हाच खरा प्रश्न आहे.
दरम्यान, चांगल्या गोष्टींचे अनुकरण केलेच पाहिजे, मात्र तो चांगुलपणा आपणच सुरु केला, असा फुकटचा आविर्भाव कोणी उराशी बाळगू नये. एवढेच यानिमित्ताने अधोरेखित करावेसे वाटते, बाकी सर्व सुज्ञ आहेतच.
ग्रामीण भागातील माझ्यासारख्या अनेक खेळाडूंना पीएनपी चषकामुळे हक्काचे व्यासपीठ मिळाले. या स्पर्धेमुळे आम्हाला मोठी प्रसिद्धी मिळाली. याचा पुढे जाऊन नक्कीच फायदा होईल. मी आदिवासी समाजातील असून, माझ्यातील कौशल्य दाखविण्याची संधी मिळाल्याने खूष आहे. या स्पर्धेने उदयोन्मुख खेळाडूंना नवी ओळख दिली. पीएनपी चषक स्पर्धेतून मला दुचाकी बक्षीस मिळाल्याचा आनंद आहे. कारण, माझ्याकडे दुचाकी नव्हती.
किशोर नाईक,
गोलंदाज