मृतांच्या वारसांना मिळणार आर्थिक मदत; आ. जयंत पाटील यांची प्रशासनाकडे मागणी

| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील पेझारी नजीकच्या दिवलांग येथे शनिवारी रात्री वीज पडून बाप-लेकाचा दुर्देवी मृत्यू झाला होता. या मृतांच्या वारसांना तातडीने आर्थिक मदत मिळावी. यासाठी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. लवकरच मृतांच्या वारसांना सुमारे आठ लाख रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे.

दिवलांग येथील रघुनाथ म्हात्रे आणि त्यांचा मुलगा ऋषिकेश म्हात्रे हे दोघे शनिवारी रात्री शेतावर गेले होते. अतिवृष्टीमुळे वीज कोसळून दोघेही जागीच मृत पावले. या घटनेची माहिती आ. जयंत पाटील यांना समजताच अलिबागचे तहसीलदार यांच्याशी संपर्क साधून म्हात्रे कुटुंबियांना तात्काळ जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळवून देण्याबाबत चर्चा केली. तसेच याबाबतचा पत्र व्यवहार देखील केला होता.

दरम्यान, शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी मंगळवारी दुपारी दिवलांग येथे जाऊन म्हात्रे कुटूंबियांची सांत्वनपर भेट घेऊन त्यांना धीर दिला. यावेळी चित्रलेखा पाटील यांनी मृतांच्या वारसांना 25 हजार रुपयांची आर्थिक मदत केली. तसेच यापुढेही त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.

Exit mobile version