जिल्ह्यात 1 हजार 684 जणांच्या वारसांचे अर्ज
। अलिबाग। विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात कोरोना मुळे 4 हजार 587 जणांचा मृत्यू झाला आहे. या सर्व मृतांच्या वारसांना शसनाकडून 50 हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. आत्ता पर्यंत 1 हजार 684 जणांच्या वारसांनी मदतीसाठी अर्ज दाखल केले आहेत. प्रस्तावांची छाननी पनवेल महानगर पालिका आणि जिल्हा शल्यचिकीत्सकांच्या मार्फत केली जाणार आहे.
रायगड जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात कोरोना 1 लाख 72 हजार 228 जणांना कोरोनाची लागण झाली होती. यापैकी 1 लाख 67 हजार 727 जण उपचारानंतर बरे झाले. 4 हजार 587 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कोरोनामुळे दगावलेल्या व्यक्तींच्या वारसांना शासनाकडून प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. याबाबतचे शासन आदेश नुकतेच निघाले आहेत.
त्यामुळे कोरोनामुळे दगावलेल्या 4 हजार 587 रुग्णांच्या वारसांना शासन आदेशाप्रमाणे प्रत्येकी 50 हजाराची रक्क्म मिळू शकणार आहे. राज्य आपत्ती निवारण निधीतून ही रक्कम थेट मृतांच्या वारसांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. यासाठी राज्यसरकारकडून एक पोर्टल विकसीत करण्यात आले आहे. यावर ऑनलाईन पध्दतीने अर्ज करता येणार आहे. याशिवाय ग्रामपंचायत कार्यालय आणि सेतू कार्यालयाच्या माध्यमातून मृतांच्या वारसांना अर्ज करता येणार आहे. यासाठी जिल्ह्याला 22 कोटी 90 लाख येवढ्या निधीची आवश्यकता भासणार आहेत.
जिल्ह्यात आत्ता पर्यंत 1 हजार 684 मृतांच्या वारसांनी मदतीसाठी ऑनलाईन नोंदणी केली आहे. या अर्जांची छाननी करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. पनवेल महानगर पालिका हद्दीत मनपाच्या आरोग्या अधिकार्यांमार्फत अर्जांची छाननी होणार आहे. तर उर्वरीत रायगड जिल्ह्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त होणारे अर्ज हे पडताळणीसाठी जिल्हा रुग्णालयाकडे आणि पनवेल महानगर पालिका आरोग्य विभागाकडे पाठविले जातील, अर्जांची वैधता तपासण्याचे काम जिल्हा शल्यचिकीत्सकांच्या अध्यक्षतेखालील समिती करेल. त्यानंतर पात्र लाभार्थ्यांची यादी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे प्राप्त होईल. यानंतर मृतांच्या वारसाच्या खात्यात राज्य आपत्ती व्यवस्थापन सहाय्यता निधीतून ही मदत जमा केली जाणार आहे.
जिल्ह्यातील कोरोनाची सद्यस्थिती…..
जिल्ह्यात सध्या उपचाराधीन 399 रुग्ण आहेत. राज्यात सर्वाधिक रुग्ण संख्या असणार्या पहिल्या दहा जिल्ह्यात रायगडचा समावेश आहे. जिल्ह्यात सध्या पनवेल मनपा हद्दीतील 263, पनवेल ग्रामिण हद्दीतील 44, उरण मधील 9, खालापूर मधील 8, कर्जत 14, पेण 18, अलिबाग 12, मुरुड 3, माणगाव 9, रोहा 7, तळा 1, म्हसळा 1, श्रीवर्धन 1, महाड 7 आणि पोलादपूर मधील 2 रुग्ण आहेत. त्यामुळे सतर्कता बाळगणे गरजेचे आहे.