। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
पेण तालुक्यातील वडखळ येथे जेएसडब्ल्यू कंपनीत 24 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास अपघात घडला. बी.एफ प्लांट 2 ब्लास्ट फरनिस 2 येथे गरम पाण्याच्या टाकीतील पाणी ओव्हरफ्लो होऊन अचानक बाहेर आहे. ते पाणी त्या ठिकाणी काम करणार्या 7 कमागारांच्या अंगावर पडल्याने ते गंभीररित्या जखमी झाले. त्यांना तातडीने पेण ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यापैकी 4 कामगारांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तसेच अन्य दोघांना पुढील उपचाराकरीता ऐरोली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. ठेकेदार व कंपनीने मृत व्यक्तींच्या कुटूंबियांना प्रत्येकी 15 लाख रुपये देण्याचे आश्वासन देत प्रकरण रफादफा केले. मात्र, आजमितीस त्यांना एकही रुपया मिळालेला नाही. त्यामुळे कमवता मुलगाही गेला आणि कंपनीनेही ठेंगा दाखविल्याने त्या कुटूंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे.
या अपघातात चंदनकुमार ननहक महता (19), मुळ रा. मधूबनी, ता. चिरया, जि. पुर्वी चंपारण, बिहार, जितेंद्र योगेंद्र राय (36), मुळ रा. बिन्टबसीनी, ता. आदापूर, जि. पुर्वी चंपारण, बिहार, ईरशाद वकील अन्सारी (28), मुळ रा. बिदबासणी, ता. मोतीहरी, बिहार व योगेंद्रकुमार संभू महतो (27), मुळ रा. इनरवा फुलवार, ता. चिरया, जि. पुर्वी चंपारण, बिहार या चौघांचा मृत्यू झाला. यापैकी योगेंद्रकुमार महतो याचा 26 नोव्हेंबर रोजी उपचारादरम्यान ऐरोलीतील नॅशनल बर्न रुग्णालयात मृत्यू झाला. हे सारे कामगार जेएसडब्ल्यू कंपनीने नेमून दिलेल्या जे.पी.म्हात्रे यांच्या शिवदत्ता एन्टरप्रायझेस या ठेकेदारामार्फत कंपनीत काम करीत होते.
कमलेश नवल महतो यांनी दिलेल्या तक्रारीनूसार, हे कामगार गेल्या सात महिन्यांपासून ब्लास्ट फरनेस 2 या प्लांटमध्ये हाऊसकिपिंगचे काम करीत होते. घटनेच्या दिवशी कमलेशची बी शिपमध्ये सकाळी 10 ते 6 अशी ड्यूटी होती. प्लांटमधील सी.सी.पी.एरिया या ठिकाणी काम करीत असताना दुपारी 3.25 च्या सुमारास स्लॅग ग्रेन्यूएलेशन येथील ड्रममधील गरम पाणी अचानक बाहेर आले. अंगारवर गरण पाणी पडल्याने चंदनकुमार, जितेंद्र राय, ईरशाद अन्सारी, ब्रिजेशकुमार, जोगिंदर कुमार हे गंभीररित्या भाजले. तर अमन कुमार व एम.डी.अख्तर यांना किरकोळ दुखापत झाली. कंपनी प्रशासनाने तातडीने जखमींना रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी चंदनकुमार व जितेंद्र राय यांना पेण ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. तर ईरशाद अन्सारी यांचा ऐरोलीतील नॅशनल बर्न रुग्णालयात सायंकाळी सहा वाजता मृत्यू झाला.
अपघाताऐवजी अकस्मात मृत्यूची नोंद
कंपनी प्रशासन तसेच ठेकेदाराने दिलेल्या आमिषावर भूलून मृत कुटूंबियांच्या नातेवाईकांची कंपनी ठेकेदाराविरोधात कोणतीही तक्रार नसल्याचे पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. आता नातेवाईकांनी हे कुणाच्या दबावाखाली तर केले नाही ना, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. अपघाती मृत्यू झाला असतानाही अकस्मात मृत्यूची नोंद का करण्यात आली, असा सवालही नागरिकांकडून उपस्थित करण्यात आला आहे.
कंपनीकडून मदत देण्यास टाळाटाळ?
नातेवाईकांच्या सांगण्यानूसार, कंपनीने पैसे न दिल्यामुळे नातेवाईकांना मदत दिली जात नसल्याचे ठेकेदाराकडून सांगण्यात आले. तसेच कंपनीने ठेकेदाराला निधी दिल्यानंतर मदत मिळेल, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे कंपनी मदत देण्यास टाळाटाळ करीत आहे, की ठेकेदारानेच पैसे लाटले, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
ठेकेदाराकडून उडवाउडवी
शिवदत्ता एन्टरप्रायझेसचे जे.पी.म्हात्रे हे जेएसडब्ल्यू कंपनीला कामगार पुरवितात. हा अपघात झाल्यानंतर कंपनीकडून 15 लाख रुपये प्रत्येकी दिले जातील, असे म्हात्रे यांनी कुटूंबियांना सांगितले होते. आज तीन महिने उलटूनही त्या कुटूंबियांना एक रुपयादेखील दिला नाही. याबाबत नातेवाईकांनी विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.
घटना घडल्यानंतर तात्काळ त्याची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. कुटूंबियांना 15 लाखांची मदत मिळाली, असे लेखी दिले होते. मात्र जर कुटूंबियांना मदत मिळाली नसेल, तर तातडीने कारवाई करण्यात येईल. सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव यांना नातेवाईक व कंपनी प्रशासनाकडे माहिती घेण्यास सांगितले आहे. बुधवारी दोघांना बोलावून समक्ष माहिती घेऊ. मात्र ही भरपाई कंपनीला द्यावीच लागेल. जी कायदेशीर आहे.
प्रसाद पांढरे,
पोलीस निरीक्षक, वडखळ
अपघात घडल्यानंतर मृतदेह गावाला नेण्यासाठी ठेकेदार व कंपनीने 50 हजार रुपये प्रत्येकी दिले. त्यानंतर आज तीन महिने झाले. कोणीही एक रुपया दिला नाही. याबाबत ठेकेदार जे.पी.म्हात्रे यांना विचारणा केली असता पुढील महिन्यात देऊ, कंपनीने अजून पैसे दिले नाहीत, अशी उत्तरे दिली जात आहेत. कुटूंबियांना लवकर मदत मिळाली, तर फार बरं होईल.
कमलेशकुमार नवल महतो,
तक्रारदार तथा कामगार