। रसायनी । वार्ताहर ।
एक चांगल्याप्रकारे विकसीत झालेला औद्योगिक पट्टा म्हणून रसायनी परिसराचा उल्लेख केला जातो. या ठिकाणी उद्योगधंद्यांबरोबरच नागरिककरणातही झपाट्याने वाढ झाली खरी, मात्र पाताळगंगेचे पाणी आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगामधील समृध्द वनसंपदा धोक्यात आली असल्याचे येथे प्रकर्षाने जाणवू लागले आहे. एकेकाळी किलबिल करणारे पक्षांचे थवेच्या थवे आता गायब झाल्याचे दिसून येत आहेत. विधी, कार्यात ज्या पक्षांना स्थान देण्यात आलेले आहेत, असे पक्षीही आता दिसेनासे झाले आहेत. रानटी पक्षी तर सोडाचं या परिसरात हमखास दिसणारे कावळेही गायब झाले आहेत.
वाढते औद्योगिकीकरण आणि जैविक विविधतेला पोहचलेला धोका रसायनी परिसरात पदोपदी दिसून येत आहे. रसायनीतील गुळसुंदे येथील यादवकालीन सिद्धेश्वर मंदिरासमोरील वाहणार्या पाताळगंगा नदीवर दशक्रिया विधी होत असतात. या ठिकाणी एका व्यक्तीच्या दशक्रिया विधीसाठी आलेली माणसे भाताच्या पिंडाला कावळ्यााने स्पर्श करावा, या प्रतिक्षेत बसली होती. बराचवेळ होउनही कावळा काही पिंडाला स्पर्श करीत नव्हता. कावळे असतील तर ते येणार, परंतु नातेवाईक वाट पहात होते. बर्याच वेळानंतर कुठूनतरी एक कावळा येउन पिंडाला शिवतो आणि मग सर्वजण सुटकेचा निःश्वास सोडतात. तोपर्यंत सर्व नातेवाईकांचा जीव भांड्यात पडलेला असतो.