एकाचवेळी 15 मुले शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागात असलेल्या कळंब येथील पीएमश्री जिल्हा परिषद शाळेमधील तब्बल 15 विद्यार्थ्यांनी राज्य शिक्षण मंडळाची पाचवी इयत्तेसाठी असलेली पूर्ण प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण होण्याचा मान मिळविला आहे. एका जिल्हा परिषद शाळेतील 15 विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी होण्याचा मान मिळविल्याने या शाळेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कर्जत तालुका शिक्षण विभागाच्यावतीने यावर्षी शिष्यवृत्ती परीक्षेचा टक्का वाढावा यासाठी अतिरिक्त वर्ग तसेच सराव परीक्षा यांचा अवलंब गटशिक्षण अधिकारी संतोष दौंड यांच्या माध्यमातून झाले होते. त्याचा परिणाम राज्य शिक्षण मंडळ पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत दिसून आला आहे. कर्जत तालुक्यात कळंब येथे असलेल्या पीएमश्री जिल्हा परिषद केंद्र शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठी आघाडी घेतली आहे. या शाळेतील तब्बल 15 विद्यार्थ्यांनी पूर्ण प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन करताना मोठी बाजी मारली. पाचवीमध्ये शिकणार्या विद्यार्थ्यांची सर्व तयारी मुख्याध्यापक के.डी. राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली वर्गशिक्षक सहदेव चव्हाण यांनी करून घेतली आणि त्यांना शिक्षक एच.के. लोहकरे, तज्ज्ञ शिक्षक किशोर पाटील, जितेंद्र रोटे, रुपेश मोरे, बाळकृष्ण पवार, शिक्षिका कल्पना, सुनीता, हुमेरा दुराणी यांनी सहकार्य केले. या सर्वांच्या सांघिक परिश्रमातून कळंब येथील जिल्हा परिषद शाळेने शिष्यवृत्ती परीक्षेत मोठे यश संपादन केले आहे.
या शाळेतील 15 विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन करताना किमान 60 टक्के गुण मिळविले आहेत. त्यात आदित्य वसंत खडेकर या विद्यार्थ्याने 73 टक्के गुण मिळवून आपले शाळेचे नाव उंचावले आहे. या शाळेतील आरोही रवींद्र बनसोडे, दर्शिका सागर बदे, दूर्वा किशोर बदे, आर्या अनिल गीते, आदिराज रमेश बनसोडे, प्रणव राजन खडेकर, आर्य शाम बदे, राज संतोष पेमारे, सोहम आतिष मानकामे, रोशन दिनेश काळण, निशांत मधुकर सोनावळे, मयुरेश धनंजय गवळी, साहिल विजय पाटील, अक्षय विश्वनाथ पाटील यांनी शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण करून मोठे यश संपादन केल्याबद्दल कौतुक होत आहे. या शाळेत शिकणारे विद्यार्थी हे कळंब आणि बोरगाव परिसरातील आहेत.