| कर्जत | प्रतिनिधी |
मुंबई, पुणे दोन मोठ्या शहरांच्या मध्यवर्तीचे ठिकाण आणि तिसरी मुंबई म्हणून नव्याने ओळख असलेला कर्जत तालुका अनेक समस्यांचे माहेरघर बनला आहे. कर्जत तालुक्याला नागरिकांच्या महत्वाच्या समस्यांनी मोठ्या प्रमाणात घेरले आहे. देश स्वतंत्र होऊन 78 वर्षे झाली तरी अजून तालुक्यातील ग्रामीण भागात रस्ते, वीज, पाणी नाही. तालुक्यातील अनेक वाड्यांवर पिण्याच्या पाण्याची सोय नाही आजही तालुक्यातील वाड्या, गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
तालुक्यातील ग्रामीण भागातील समस्यांसारख्या समस्या शहरी भागात निर्माण होत आहेत. सध्या वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा फटका सर्वांनाच पडत आहे. त्याचा मुख्य परिणाम कर्जत नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा योजनेवर होत असल्याने पाणीपुरवठा वेळेवर होत नाही. कधी पाणी येते, तर कधी येत नाही.
सरकारी कार्यालयांवर कोणाचे नियंत्रण नाही जनतेची कामे होत नाहीत. त्यासाठी अनेक फेर्या माराव्या लागत आहेत किंवा फाईलवर काहीतरी वजन ठेवावे लागत आहे. या सगळ्या गोष्टीचा जनतेला त्रास सहन करावा लागत आहे.
पूर्वी सत्ताधारी पक्षाच्या विरुद्ध विरोधी पक्ष जनतेच्या समस्यांसाठी मोर्चे-आंदोलन करत असत. मात्र, आता जनतेच्या विकासापेक्षा सत्तेत राहून सत्तेचा उपभोग घेण्यासाठी सर्वच पक्ष एकत्र येताना दिसत आहेत. जनतेच्या कामापेक्षा आपले अस्तित्व महत्त्वाचे झाले आहे. सर्वच लोकप्रतिनिधींचा शासनाच्या अधिकार्यांवर वचक राहिलेला नाही, त्यामुळे सरकारी अधिकारी-कर्मचारी मनमानी कारभार करत आहेत. आता आपल्या प्रश्नासाठी जनतेलाच आंदोलने, उपोषणे करावी लागत आहेत.
एसटी सेवा नाही
शासनाची लालपरी अनेक गावांना जात नाही, त्यामुळे जास्त पैसे देऊन नागरिकांना खासगी गाड्या किंवा जास्त भाडे देऊन रिक्षाने वाहतूक करावी लागते.
आरोग्य सेवा
तालुक्यातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्र बंद आहेत, तर काही ठिकाणी ग्रामीण रुग्णालयांच्या इमारती उभे आहेत, मात्र त्या ठिकाणी रुग्णांना कोणतीही सेवा मिळत नाही. तीच परिस्थिती शहरातील उपजिल्हा रुग्णालयाची आहे. याठिकाणी कोणतीही आरोग्य सेवा उपलब्ध नाही.
इंटरनेटचा बोजवारा
ग्रामीण भागात बँक आहेत, मात्र इंटरनेटसेवा अनेक वेळा बंद असल्याने नागरिकांना मानसिक, शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. हीच परिस्थिती तालुक्याचे ठिकाण असलेल्या कर्जत शहरासुद्धा पाहायला मिळत आहे.
पाणी योजना बंद
कर्जत तालुक्यातील अनेक पाणी योजना बंद आहेत. तर, तीच परिस्थिती कर्जत शहरातील नगरपरिषदेमध्ये सध्या पाहायला मिळत आहे. पाणी वेळेवर मिळत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
वीजपुरवठा
सध्याच्या युगात अनेक नवीन टेक्निकल योजना आल्या आहेत. मात्र, पूर्वीपेक्षा सध्याचे दिवस खराब आहेत. दिवसेंदिवस वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वीजपुरवठा नियमित नसल्याने अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे.
ट्रॅफिक जामची समस्या
शहरात वाहतुकीचा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे, बाजारपेठेत छोट्या मोठ्या भाजी, फ्रुट अन्य व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्याने पादचार्यांचे चालणे कठीण झाले आहे. रस्ता शोधून चालायला लागत आहे. यावर नगरपरिषद प्रशासनाचे नियंत्रण नाही, ट्रॅफिक जामची समस्या रोजच उद्भवत आहे. सध्या मोठ्या पुलावर म्हणजेच श्रीराम पुलावर व चार फाटा येथे रोजच ट्रॅफिक जाम होत आहे.