इंदरदेव धनगरवाडाची पुनरावृत्ती टळली
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
सुधागड आणि रोहा तालुक्याच्या सीमेवर असणार्या खरबाचीवाडी गावाच्या परिसरात गवताच्या माळाला दुपारच्या वेळी वणवा लागला. या वणव्याची तीव्रता एवढी होती की, बघता-बघता हा वणवा खरबाचीवाडी गावात पोहोचला. संपूर्ण गाव वणव्याच्या विळख्यात सापडले. त्यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले. त्यावेळी रोहा पोलीस ठाण्याशी संपर्क करून घटनाक्रम सांगितला असता, त्यांनी अग्निशमन दलाच्या गाडीला घटनास्थळी बोलवले.ही आग विझवण्यासाठी शेजारील गावातील ग्रामस्थ, तसेच रोहा पोलीस कर्मचारी, वनरक्षक यांनी प्रयत्न केले. त्यामुळे इंदरदेव धनगरवाडाची पुनरावृत्ती टळली आहे.
या वणव्याने अचानक गावातील सुकलेल्या फणसाच्या वृक्षाने पेट घेतला आणि त्यातील ठिणगी उडून गावाच्या मध्यभागी असणार्या मधुकर कदम यांच्या मालकीच्या गुरांच्या गोठ्यावर पडली आणि हळूहळू गुरांच्या गोठ्याने पेट घेतला. काही वेळातच त्या गोठ्यातील पेंढ्याने पेट घेऊन आगीने उग्ररूप धारण केले. रोह्यावरून अग्निशमन दलाची गाडी पोहोचेपर्यंत ग्रामस्थ शर्थीचे प्रयत्न करून आग विझविण्याचा प्रयत्न करत होते. गुरांच्या वाड्याशेजारील घरांना आग लागण्यास सुरुवात झाली होती. त्यावेळेस मधुकर कदम यांची मुलगी दामिनी हिने प्रसंगावधान दाखवत त्या आग लागलेल्या घरातील सिलिंडर टाक्या घरात जाऊन बाहेर काढून अनर्थ टाळला. अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाल्यावर अग्निशमन दलाचे जवान आणि ग्रामस्थ यांच्या अथक परिश्रमाने या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. मात्र, या वणव्यात मधुकर कदम यांचा वाडा, त्यातील पेंढी जळून खाक झाले तसेच शेतकरी शरद गोळे यांची 50 आंब्यांची झाडे जळाली, त्यामुळे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले.