| बुलढाणा | वृत्तसंस्था |
बुलढाणा जिल्ह्यात दोन मुलांचे अपहरण झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनेत एकाचा खून करून त्याला उकिरड्यात पुरल्याचे उघडकीस आले आहे, तर दुसरा 14 वर्षीय मुलगा अजूनही बेपत्ता आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील अंबाशी गावात दोन दिवसांपूर्वी 10 वर्षीय शेख अरहान शेख हारून मुलाचे अपहरण झाले होते. तपासाअंती त्याचा खून झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी युद्धपातळीवर चिमुकल्याचा शोध घेतला असता गावातील शेख अन्सार नावाच्या नातेवाईकावर संशय आल्यामुळे त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता. त्याने अरहानचा गळा आवळून खून केल्याची कबुली दिली आहे. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह उकिरड्यात पुरल्याचे पोलिसांना सांगितले. आरोपीवर गुन्हा दाखल करून पोलिसांनी अरहानचा मृतदेह रात्रीच उकिरड्यातून काढून ताब्यात घेतला. आरोपी शेख अन्सार शेख नसीर यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. या घटनेने अंबाशी गावात एकच खळबळ उडाली आहे.
ही घटना ताजी असतानाच शेगाव तालुक्यातून आणखी धक्कादायक बातमी समोर आली आहे. शेगाव तालुक्यातील नागझरी येथील14 वर्षीय कृष्णा राजेश्वर कराळे मुलगा कालपासून बेपत्ता आहे. मंगळवारी सकाळी 10 वाजता शाळेत गेलेला कृष्णा शाळा संपल्यावर घरी परतला नाही. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी शोध घेतला पण गावात आणि शाळा परिसरात कुठेही तो सापडला नाही. तो शेगाव येथील एका विद्यालयात वर्ग आठवीमध्ये शिक्षण घेत आहे. त्याचे कुटुंबीय चिंतेत असून ठिकठिकाणी त्याचा शोध सुरू आहे. गेल्या काही दिवसांत जिल्ह्यात अल्पवयीन मुलांचे बेपत्ता होण्याच्या घटना वाढल्या आहेत. आपल्या मुलांवर देखरेख ठेवून काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे असे आवाहन पोलिसांनी केले आहे.