। कोर्लई । वार्ताहर ।
राज्यात गेले काही दिवस अवकाळीच्या आगमनामुळे मुरूड तालुक्यातील रस्त्याच्या दुरावस्थेत भर पडल्याचे चित्र समोर येत आहे. त्यातच नांदगाव बाजारपेठ-मच्छिमार्केट रस्त्यावर पडलेले खड्डे अपघाताला आमंत्रण ठरत असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षाबाबत वाहनचालक व प्रवासी वर्गातून नाराजी व्यक्त केली जात आहे. तालुक्यातील रस्त्याची समस्या पाठ सोडायला तयार नाही. ऋतूमान कोणताही असो, खड्डे आपल्या साम्राज्याची पुनर्उभारणी करणारच. त्यात अवकाळी पावसाच्या आगमनामुळे त्यांना आधार मिळतोचा आहे. असाच आधार घेत, ऐन थंडीच्या हंगामात अवकाळीसह खड्ड्यांचे आगमनदेखील झाले आहे.
अधिच साळाव ते मुरुड रस्त्यावर अनेक ठिकाणी झाडाझुडुपांचा विळखा असल्याने, त्याचा वाहनचालक व प्रवासीवर्गाला त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच खड्ड्यांच्या वारंवार येण्यामुळे नागरिक तथा प्रवासी त्रस्त झाले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी वर्गाने यात तातडीने लक्ष पुरवून साळाव-मुरुड रस्त्यावरील तसेच नांदगाव बाजारपेठ- मच्छिमार्केट भागातील खड्डे बुजविण्यात यावेत, अशी मागणी वाहनचालक व नागरिकांतून होत आहे.