। तळा । वार्ताहर ।
तालुक्यातील शेणवली येथे शेतात विजेच्या धक्क्याने मृत्युमुखी पडलेल्या मुलाच्या नातेवाईकांना महावितरण विभागाने चार लाखांची मदत जाहीर केली आहे. खांबवली आदिवासी वाडी येथील ऋतिक यशवंत हिलम या दहा वर्षाच्या मुलाचा शेणवली येथील शेतात विद्युत तारेचा धक्का लागल्याने मृत्यू झाला होता. यामुळे संतप्त झालेल्या शेकाप चिटणीस धनराज गायकवाड व ग्रामस्थांनी भरपाई मिळेपर्यंत मुलाचा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेतली होती. माणगाव उपजिल्हा रुग्णालयाबाहेर शेकाप नेते निलेश थोरे, धनराज गायकवाड व ग्रामस्थ भरपाई च्या मागणीसाठी एकवटले होते. अखेर उपकार्यकारी अभियंता तळा यांनी रुपये चार लाख नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासन दिले असून तूर्तास अतितातडीची मदत म्हणून 20,000 रुपये व प्रवास खर्च 2 हजार असे 22,000 रुपयांची रोख मदत हिलम कुटुंबीयांकडे सोपविण्यात आली आहे. तसेच उर्वरित 3,78,000 रुपये सर्व कागदपत्रांची पूर्तता झाल्यावर देण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासन दिले आहे