| रायगड | प्रतिनिधी |
प्रत्येक माणसाने आपल्या जीवनात एकाग्रता जपण्यासाठी योग करणे अत्यंत महत्वाचे आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले. जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नेहूली येथील प्रशस्त बॅडमिंटन हॉल येथे आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, शिक्षणाधिकारी महारुद्र नाले, मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम, जिल्हा क्रीडा अधिकारी प्रकाश वाघ तसेच अमित फुंडे, तपस्वी गोंधळी, सुचिता ठमाळे, आकाश डोंगरे, श्री अंबिका योग कुटीरचे संस्थापक विरेंद्र पवार यांच्यासह संस्थेचे प्रशिक्षक तसेच स्वयंसिद्धा सामाजिक विकास संस्थेचे स्वयंसेवक, प्रशिक्षणार्थी, सरकारी अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी जावेळे म्हणाले की, आपल्या देशाचे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्र महासभेत भाषण करताना संपूर्ण जगाला योगाचे महत्त्व पटवून दिले. संयुक्त राष्ट्र महासभेने अधिकृतपणे 21 जून हा ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून घोषित केला. ’अप्राप्त वस्तू प्राप्त होणे’ याला योग म्हणतात. प्राणायाम ध्यान आसनेतून मानसिक एकाग्रता वाढते. त्यातून आपल्याला जे साध्य करायचे आहे ते साध्य होते. नेमून दिलेले कर्म विहित वेळेत, सातत्याने केले तर आपण चांगल्या विश्वाची निर्मिती करू शकतो. एकाग्रता मिळवण्यासाठी योग केले पाहिजे. तसेच, शिस्त योगाद्वारे लागते, आरोग्य सुधारते. आज प्रत्येकाला ताण-तणावाला सामोरे जावे लागते. त्यामुळे तणावमुक्त राहण्यासाठी आपण सर्वांनी आपल्या जीवनशैलीमध्ये नियमितपणे योगा, व्यायामांचा समावेश करावा, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.