काम जलद पूर्ण करण्याची मागणी, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
| पाली/बेणसे । वार्ताहर ।
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर कोलाड -पुई गावानजीक असलेला महिसदरा नदीवरील ब्रिटिशकालीन पूल वाहतूक व प्रवासाच्या दृष्टीने अत्यंत जीवघेणा व धोकादायक बनला आहे. हा पूल कोसळला तर मुंबई गोवा महामार्ग वाहतूक पूर्णपणे ठप्प होणार आहे. पनवेल ते इंदापूर या 84 किमीच्या पहिल्या टप्प्याचे काम तब्बल 13 वर्षांपासून रेंगाळले आहे.अशातच या मार्गावरील पुलांची काम देखील रखडली आहेत. या पुलावरून दिवसरात्र प्रवाशी वाहतुकीसह अत्यंत अवजड, ओव्हरलोड वाहतुक होत आहे. अरुंद पूल असल्याने वाहतुकीला देखील वारंवार अडथळा येतो. पुलावर अपघाती घटना देखील घडतात.
या पुलावरून वाहने जाताना जबर हादरे बसतात. पुलावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत तर पुलाची खालील बाजू खचलेली, पुलाला ठिकठिकाणी तडे गेले आहेत. सळ्या बाहेर निघालेल्या अवस्थेत आहेत. मुख्य खांब काही घटकेचे सारथी असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. संबंधित प्रशासन व सरकारने कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी उपाययोजना करावी, नवीन पुलाचे मजबूत व दर्जेदार बांधकाम करून प्रवाशी व वाहनचालक यांचा प्रवास सुखकर व सुरक्षित करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी होत आहे.
सदयस्थितित हा पूल खुप धोकादायक बनला आहे. साधारणतः दहा वर्षांपूर्वी याच पुलाच्या बाजूला नवीन पुलाचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र ते काम अद्याप रखडले आहे. या पुलाची धोकादायक स्थिती असताना आजघडीला केवळ मलमपट्टीचे काम केले जात आहे. या पुलावरून प्रवास करताना जिव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. – संजय मांडलुस्कर, रहिवाशी