भाजप हा या देशातील सर्वाधिक निवडणुकोत्सुक पक्ष आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी निवडणुका लढवण्याची 1001 तंत्रे विकसित केली आहेत. जे.पी. नड्डा यांना शिवसेनेसकट या देशातील सर्व पक्ष संपवायचे आहेत तेही निवडणुकीच्याच माध्यमातून. अशा या पक्षाची एखाद्या निवडणुकीतील माघार हीदेखील पूर्णपणे स्वतःच्या फायद्यासाठी असणार हे स्पष्ट आहे. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीबाबत दोन गोष्टी नक्की दिसतात. एक म्हणजे पक्षाचे उमेदवार मुरजी पटेल यांच्या पात्रतेबाबतच कायदेशीर सवाल उपस्थित झाले होते व ते प्रकरण जड जाणारे होते. पण त्याहूनही महत्वाचे म्हणजे आपला पराभव होणार हे त्या पक्षाच्या लक्षात आले होते. पन्नाप्रमुखांनी तसा अहवाल दिलेला असणारच. ही निवडणूक रमेश लटके यांच्या निधनामुळे होत होती. त्यामुळे त्यांच्याविषयीच्या सहानुभूतीचा फायदा त्यांच्या पत्नी ऋतुजा यांना मिळणार होताच. याखेरीज शिंदे गटाने ज्या रीतीने सत्ता बळकावली आहे त्याविषयी एक नाराजीही लोकांमध्ये आहे याचा अंदाज भाजपला आला असावा. त्यामुळेच त्यांनी आपली मूठ झाकलेलीच ठेवायचा निर्णय घेतल्याचे दिसते. त्यासाठी माघारीचे मोठे नाटक रचण्यात आले. राज ठाकरे यांचे पत्र हा त्याचाच भाग होता. हे पत्र आल्यानंतर माघारीची शक्यता फेटाळून न लावता पक्ष काय तो निर्णय घेईल असे जेव्हा देवेंद्र फडणवीस म्हणाले तेव्हाच हा सर्व ‘अगं अगं म्हशी’, अशासारखा प्रकार चालू आहे हे स्पष्ट झाले होते. सोमवारी त्यावर विधिवत शिक्कामोर्तब करण्यात झाले इतकेच. आधी राज यांनी व नंतर शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीची वगैरे भाषा केली आहे. एखादा लोकप्रतिनिधी वारला तर त्यानंतर होणार्या निवडणुकात त्याच्या नातेवाईकांच्या विरोधात उमेदवार न देणे म्हणजे मोठी संस्कृती आहे असे ठाकरे व पवार यांना वाटते. संसदीय राजकारण म्हणजे खासगी जहागिरी असल्याचे मानण्याचा हा सर्व प्रकार आहे. पण तो स्वतंत्रच विषय आहे. भाजपच्या नेत्यांनीही माघार घेताना त्याचीच री ओढली आहे. त्यावरून हे सर्व पक्ष जनतेला किती मूर्ख समजतात आणि बनवतात हे लक्षात येते. ही संस्कृती पंढरपूर निवडणुकीत गायब होती. अंधेरीतही सोमवारपर्यंत या संस्कृतीची आठवणदेखील नव्हती. शिवसेनेचे नाव व निवडणूक चिन्हाच्या प्रकरणाची निवडणुकीपूर्वी सुनावणी व्हावी यासाठी भाजपने अनेक डावपेच लढवले. सर्वोच्च न्यायालयात शिंदे गटासाठी महागड्या वकिलांची फौज उभी करण्यात आली. हा विषय निवडणूक आयोगापुढे यावा अशा रीतीने प्रयत्न करण्यात आले. नंतर आयोगाकरवी सेनेचे चिन्ह गोठवण्यात आले. पुढे सेनेच्या उमेदवार लटके यांना अर्ज भरण्यात अडथळे निर्माण करण्यात आले. आधी त्यांना शिंदे गटात ओढण्याचा प्रयत्न झाला. तो फसल्यावर त्यांचा राजीनामा मंजूर होऊ नये म्हणून पालिका अधिकार्यांवर दबाव आणण्यात आला. शिवाय, लटके यांच्याविरुध्द शेवटच्या क्षणी भ्रष्टाचाराची एक तक्रारही दाखल करवण्यात आली. हे चालू असताना भाजप, शिंदे गट किंवा राज ठाकरे त्या तथाकथित संस्कृतीबाबत गप्प होते. प्रत्यक्षात निवडणुकीची तयारी करताना अनेक मुद्दे आपल्या विरोधात जात आहेत हे भाजपच्या लक्षात आले. एक म्हणजे मुरजी पटेल हे बिगरमराठी उमेदवार होते. शिवाय, ही जागा पूर्वी शिवसेनेने जिंकलेली असल्याने स्वतःला पर्यायी सेना म्हणवणार्या शिंदे गटाने ती लढवायला हवी होती. शिंदे करीत असलेली मोदी-शहांची अवाजवी तारीफ, त्यांच्या महाकाल पूजेसारख्या कार्यक्रमांमधला अनावश्यक सहभाग यामुळे शिंदे गट हा भाजपच्या हुकुमाचा गुलाम असल्याचे चित्र तयार झाले. त्यात अंधेरीची जागा भाजपला बहाल करणे हा आणखी एक पुरावा ठरणार होता. यामुळे ठाकरे गटाला असलेली सहानुभूती वाढत चालली होती. निवडणुकीत लटके जिंकल्या असत्या तर आगामी पालिका निवडणुकांमध्ये भाजपला फटका बसला असता. त्यापेक्षा ही मूठ झाकलेलीच ठेवणे अधिक सोईचे होते. ठाकरे सेनेसाठीही हे बरेच झाले. कारण या निवडणुकीत पराभव झाला असता तर पक्षाला मुंबई पातळीवर आणखी गळती लागण्याचा धोका होता. आता लटकेच्या विजयांच्या रुपाने मिळणार्या संधीचा पक्ष किती फायदा उठवू शकतो हे पाहावे लागेल.