राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा दहा-तोंडी रावण आहे, असं त्याचे विरोधक म्हणतात. त्याला कारण आहे. एकाच विषयावर अनेक तोंडांनी बोलणे ही त्याच्या नेत्यांची खासियत आहे. सरसंघचालक मोहन भागवत हेही यात मागे नाहीत. काही महिन्यांपूर्वी काशी विश्वेश्वरालगतच्या मशिदीत पूजा करण्याचा वाद निर्माण झाला. मुस्लिम वजू करतात तेथे शिवलिंग सापडल्याचा दावा झाला. मशिदीच्या आवारात आणि भिंतींमध्ये खोदाई करण्याची मागणी करण्यात आली. प्रकरण न्यायालयात गेले. त्यावर, प्रत्येक मशीद उकरून तिथे शिवलिंग शोधत बसणं योग्य नाही असा उपदेश नागपूर येथे आपल्या कार्यकर्त्यांना भागवत यांनी केला. ये झगडा क्यूं बढाने का असा त्यांचा त्यावेळचा सवाल होता. पण आता एखाद्या राजकारण्याप्रमाणे त्यांनी पलटी मारलेली दिसते.
पापे धुणारी गंगा
पांचजन्य आणि ऑर्गनायझर या आपल्याच मुखपत्रांना दिलेल्या मुलाखतीमध्ये भागवत यांनी हिंदू समाज गेले एक हजार वर्षे लढाई लढतो आहे असे म्हटले आहे. ही लढाई मुस्लिम धर्म आणि राजे आणि त्यांचा प्रभाव यांच्याविरुध्द आहे असे त्यांना अभिप्रेत आहे. काशीतला झगडा हादेखील या लढाईचाच भाग आहे असा त्याचा अर्थ होतो. या लढाईमध्ये काही नेते जी हाणामारीची कट्टर भाषा वापरतात त्याचं समर्थनही भागवत यांनी केलं. असं होणारच, कारण शेवटी ही लढाई आहे असं ते म्हणाले. भागवतांचं हे विधान बजरंग दल, विहिंप आणि भाजपच्या कार्यकर्त्यांची सर्व पापे धुवून टाकणारी गंगा ठरणार आहे. असं तर होणारच अशा समर्थनामुळे गायीचं मांस घरात असल्याच्या संशयावरून अखलाखला ठेचून मारण्यापासून ते बिल्किस बानूवर बलात्कार करणार्यांचं स्वागत करण्यापर्यंतचे तमाम सर्व गुन्हे हे धर्मकृत्ये ठरणार आहेत. या आणि इतर अनेक घटनांमधील आरोपींविरुध्द पोलिसांनी उशिराने व नाईलाजाने का होईना कारवाई केली आहे. ती एरवीही तोंडदेखलीच होती. आता तर ही प्रकरणे गुंडाळली गेल्यात जमा आहेत. मारहाण करणं वा तशा धमक्या देणं हे रस्त्यावरचे गुंड करतात. भागवतांसारख्या नेत्यानं धार्मिक मुलामा चढवून त्यांचं समर्थन करावं हे भयंकर आहे.
तेव्हा कुठे होता संघ?
काहीच महिन्यांपूर्वी ब्राह्मणांनी अस्पृश्यतेबाबत पापक्षालन करावं असं सांगताना भागवतांनी राज्यघटना ही सर्वोच्च आहे असे उद्गार काढले होते. आता तेच भागवत वेगळ्या तोंडाने बोलत आहेत. हिंदुस्थान हिंदूंचा आहे, हे मान्य करून राहायचं तर राहा नाहीतर निघून जा अशा आशयाचे उद्गारही त्यांनी या मुलाखतीत काढले. तेदेखील राज्यघटनेचा अपमान करणारे आहेत. 1947 चं स्वातंत्र्य खरं स्वातंत्र्य नव्हेच अशी एकेकाळी गुरु गोळवलकरांची भूमिका होती. तरीही पंडित नेहरुंच्या सरकारने संघाला कायद्यानुसार सन्मान दिला. त्यामुळेच संघाला आजची सत्ता दिसू शकली आहे हे भागवतांनी लक्षात ठेवलेले बरे. त्यांच्या हजार वर्षांची लढाईसारख्या दाव्यांना तर अनेकांनी अनेकदा उत्तरे दिली आहेत. तुर्क, इराणी, मंगोल इत्यादी बाहेरच्या लोकांनी केल्या त्या लढाया इथल्या राजांशी होत्या. हिंदू समाजाशी नव्हत्या. मुळात त्यावेळी हिंदू समाज किंवा पूर्ण देश एकवटलेलाच नव्हता. बाहेरून आलेल्यांविरुध्द हिंदुस्थान कधीही एकत्रित लढला नव्हता. उलट बाहेरून आलेल्यांना अनेकदा येथील हिंदू राजांनीच मदत केली. मुघलांच्या पदरी रजपूत सरदार मोठ्या प्रमाणात होते. आज ज्या उत्तर वा मध्य प्रदेशात हिंदुत्ववादी लोकांना मोठा चेव आला आहे तेथे मुघलांविरुध्द कधीही मोठे उठाव झालेले नव्हते. उलट तेव्हाचे हिंदू सरदार आणि जनतादेखील त्या राज्यांमध्ये विनाअडथळा व्यापार-धंदे, शेती, कला-संस्कृती चालवत होते. या राज्यपध्दतीविरुध्द खर्या अर्थाने उभे राहिले ते शिवाजीमहाराज. मात्र त्यांच्या डोक्यातही ही लढाई मुस्लिम विरुध्द हिंदू अशी नव्हती. अन्यथा त्यांनी वा नंतर पेशव्यांनी काही वेळेला विजापूर किंवा अन्य शाह्यांशी तह केले नसते. भागवत बोलत आहेत त्या हजारपैकी शेवटची दोनशे वर्षे इथे इंग्रजांचे राज्य होते. पण ब्रिटिशांविरुध्दच्या लढाईत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एक दिवसदेखील सहभागी नव्हता. किंबहुना, काही वेळेला तर त्यांच्या भूमिकेमुळे ब्रिटिशांनाच मदत झाली. उदाहरणार्थ त्यांच्या मुस्लिमविरोधामुळे फाळणीच्या वातावरणात भर पडली. नथूराम गोडसेने गांधीजींना गोळ्या घातल्या. पण धर्मांध मुस्लिम भाषा करणार्या जिनांना काहीही केले नाही. उलट स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या हिंदू महासभेने जिनांच्या मुस्लिम लीगशी युती करून सरकार स्थापन केले. दुसरा मुद्दा बाहेरून आलेल्यांच्या प्रभावाला विरोध करण्याबाबतचा. पूर्वापार जगभर असा विरोध होत आलेला आहे. त्याचा धर्माशी काही संबंध नाही. अमेरिका ही ब्रिटनमधल्या निर्वासित ख्रिश्चनांनी स्थापन केली. पण नंतर त्यांनी ब्रिटनच्या प्रभावाविरुध्द लढा दिला. अरब टोळ्यांच्या लढाया, शिया-सुन्नी संघर्ष, इराण-सौदी तेढ हीदेखील त्याचीच उदाहरणे आहेत. याचमुळे बांग्लादेश मुसलमान असूनही पाकिस्तानपासून वेगळा झाला.
निवडणुकांसाठीचे डावपेच
हिंदुंचे वैशिष्ट्य हेच की, बाहेरचे सर्व प्रभाव त्यांनी सामावून घेतले व तरीही आपला धर्म टिकवला. आज एकविसावे शतक चालू आहे. भारताने आधुनिक राज्यपध्दतीचा स्वीकार केला आहे. नायजेरिया, बुरोंडी, सुदान अशासारख्या देशांप्रमाणे येथे टोळीयुध्दे चाललेली नाहीत. लोकशाही देश म्हणून आपला सन्मान होत असतो. त्यामुळेच जगभरातील भांडवल, तंत्रज्ञान आणि कंपन्या आपल्याकडे येतात. या लोकशाही स्वातंत्र्याचा आणि भांडवली विकासाचा फायदा सर्वाधिक झाला तेच हिंदू आज भाजपचे समर्थक आहेत. हेच लोक मुलांना इंग्रजीत शिकवतात. ज्यांना शक्य आहे ते अमेरिकेचे नागरिकत्व मिळावे म्हणून धडपडतात. यातून आपल्या पुढच्या पिढ्या हिंदू धर्माचे काय रक्षण करणार असा प्रश्न त्यांना पडत नाही. 2019 च्या आधी मोदी सरकारची लोकप्रियता कमी झाल्याची चर्चा होती. त्यावेळी भागवत हे मुस्लिम हे हिंदूंइतकेच या देशाचे रहिवासी आहेत असे म्हणत होते. आता आगामी कर्नाटक आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी डावपेच बदललेले दिसतात. परिस्थिती कोणतीही असो, रावणाचे एक तोंड बोलायला उपलब्ध आहेच.