महाराष्ट्राने कृतघ्न होऊ नये!

मधुकर भावे

अलिकडे माझ्यासारख्या फाटक्या माणसाला कार्यक्रम करणे आर्थिकदृष्ट्या फार सोपे नाही. पण कृतज्ञाता म्हणून मुंबई मराठी पत्रकारसंघाच्या सभागृहात 13 जून रोजी सायंकाळी 5 वाजता एका छोट्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.  सर्व मित्रांना हा लेख हेच आमंत्रण आहे, असे समजून त्यांनी यावे, अशी विनंती आहे. त्या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे एकेकाळचे फार मोठे नेते उद्धवराव पाटील यांचे चिरंजीव धनंजय पाटील हे येणार आहेत. उद्धवराव दोन वेळा खासदार, तीन वेळा आमदार पण धनंजयवर 5 लाखांचे कर्ज ठेवून ते गेले. यशवंतराव चव्हाण हे उद्धवरावांना काँग्रेसमध्ये घेवून मुख्यमंत्री करणार होते. तसा निरोप त्यांनी त्यावेळचे खासदार रामराव अवरगांवकर यांच्याबरोबर पाठवला होता. उद्धवरावांनी हात जोडून नमस्कार केला… यशवंतरावांचे आभार मानले आणि निरोप दिला की, ‘मी लाल झेंड्यातच गुंडाळला जाईन…’ अशी ताठ कण्याची माणसं तेव्हा होती. भाऊसाहेब राऊत यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासाठी आर्थिक मदत करण्यारिता त्यांचे माटुंगा येथील अरोरा टॉकिज विकून टाकले होते. या धनाढ्य माणसांनी सगळा पैसा डाव्या चळवळीसाठी वापरला. त्याकाळात असेही त्यागी ‘राऊत’ होते.  आज हे सगळं आठवतं… दुसर्‍या पाहुण्या आहेत मिनाक्षी पाटील…. प्रभाकर पाटील यांची ही लढाऊ लेक… तिने किती लढ्यांत भाग घेतला… त्यांच्यासोबत मल्लिका अमरशेख (मल्लिका ढसाळ) आणि मृणालताईंची लेक अंजू वर्तक गोरे… एस. एम. जोशी यांच्या नातवाला बोलावण्याचा प्रयत्न आहे… 

13 जून 1969 ला रात्री 8 वाजता अत्रेसाहेबांनी के.ई.एम. रुग्णालयात अखेरचा श्‍वास घेतला. आचार्य अत्रे यांची 53 वी पुण्यतिथी 13 जूनला आहे. जन्म 13 अ‍ॅागस्ट 1898 चा. मृत्यू तारीख 13 जूनचीच. चार दिवसांनी पुण्यतिथी-दिन साजरा होईल.
अत्रेसाहेब गेले त्या रात्री 11 वाजता ग. दि. माडगुळकर यांच्या माहिम येथील घरी जाऊन अत्रेसाहेबांवर कविता आणली होती. रात्री 11 वाजता उभ्या-उभ्या आण्णांनी चार ओळी सागिंतल्या होत्या. त्या अशा होत्या.
‘सर्वांगाने भोगी जीवन
तरीही ज्याच्या उरी विरक्ती
साधुत्वाचा गेला पूजक
खचली-कलली श्री शिवशक्ती….’
14 जून 1969 च्या मराठात पहिल्या पानावर हि कविता छापली होती.
तो ‘मराठा’, ती चळवळ, ते मोर्चे, त्या घोषणा… अत्रेसाहेबांचे घणाघाती अग्रलेख… घणाघाती सभा… महाराष्ट्रभरचे दौरे… संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील 106 हुतात्म्यांचे बलिदान… सर्वपक्षीय नेत्यांचे एकत्र येऊन ते महाआंदोलन… लाखालाखांचे मोर्चे… महाराष्ट्र राज्य झाल्यानंतर या राज्याचे ‘मुंबई राज्य’ हेच नाव ठेवण्याचे कारस्थान या सर्व सहा वर्षांत अत्रेसाहेबांनी केलेले प्रचंड कष्ट… प्रवास… रात्र-रात्र जागरण…. आज कोणतीही सभा 10 वाजता संपवावी लागते. त्यावेळच्या सभा पहाटे 3 वाजेपर्यंत चालायच्या… एका रात्रीत तीन-तीन सभा व्हायच्या… हे आज कोणाला खरे वाटणार नाही…. एक सभा सुरू करून, पुढच्या सभेसाठी दोन वक्ते आधी जायचे… ती सभा सुरू व्हायच्या आगोदर अमरशेख यांचा डफ कडाडायचा… माईक नसायचा… पेट्रोमॅक्सची बत्तीही अनेक गावांत नसायची. तीन-तीन किंदल लावून खेड्यांपाड्यांत अमरशेख यांच्या सभा झाल्या. लाखो माणसांपर्यंत त्यांचा पहाडी आवाज पोहोचत होता. एखादा माणूस रक्त ओकला असता. त्यांच्या जोडीला शाहीर आत्माराम पाटील, शाहीर गजाभाऊ बेणी, शाहीर जंगम, अमरशेख यांच्या मागे जैनू शेख, केशर जगताप आणि त्यांचे कलापथक, बाजुला आण्णाभाऊ साठे…. सारा महाराष्ट्र घुसळून काढण्याची ताकद त्यावेळच्या नेत्यांमध्ये होती. स्वत:ला काही मिळवण्यासाठी यापैकी कोणाही नेत्यांनी काहीही केलेले नाही…. काहीही मागितलेले नाही. त्यांना काही मिळालेले नाही. या चार शाहिरांची तर आयुष्यभर फरफट झाली. अमरशेख आणि आण्णाभाऊ साठे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ या सन्मानाने गौरवित करावे, असेही कोणत्या सरकारला वाटले नाही. आणि आजच्या ‘रिक्षा सरकार’लाही तसे वाटत नाही. निदान उद्धवसाहेबांनी तरी- त्यांचे घराणे लढ्यात अग्रभागी होते म्हणून- अमरशेख आणि आण्णाभाऊ यांचा सन्मान करावा, एवढी माफक अपेक्षा आहे.
मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद ही शहरे घुसळून काढणारे अत्रे, डांगे, एस. एम., प्रबोधनकार ठाकरे, सेनापती बापट… ग्रामीण भाग घुसळून काढणारे उद्धवराव पाटील, एन. डी. पाटील, बापू लाड, क्रांतीसिंह नाना पाटील, दादासाहेब गायकवाड, भय्यासाहेब आंबेडकर (प्रकाश आंबेडकर यांचे पिताश्री) माढ्याचे एस. एम. पाटील, सांगलीचे भगवानराव सूर्यवंशी, नाशकात विठ्ठलराव हांडे, मराठवाड्यात वि. घ. देशपांडे, महिलांमध्ये पुढाकार घेणार्‍या  अहिल्या रांगणेकर, मृणाल गोरे, तारा रेड्डी…  सारा महाराष्ट्र पिंजून निघाला होता.
आज अत्रेसाहेब डोळ्यांसमोर येतात. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी ‘साहित्यिक अत्रे’ यांनी आपली लेखणी मोडून टाकली आणि पत्रकाराच्या लेखणीचा हातोडा करून महाराष्ट्राच्या शत्रूंवर त्यांनी घाव घातले. त्यावेळची ‘मराठा’ची शिर्षके आज डोळ्यांची बिबुळं बाहेर येतील, ऐवढी जहाल होती. पण ती महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी होती. आजच्या वृत्तपत्रांत स्वत:च्या समर्थनासाठीच अशी शिर्षके आहेत. धाडींचे समर्थन केले जात आहे. कोणी बाप काढतोय… कोणी फाट्यावर मारण्याची भाषा करतो… त्यावेळची भाषा  मुंबईसह महाराष्ट्र निर्माण करण्याच्या विरोधात असलेल्या मराठी विरोधकांवर होती. म्हणूनच मोरारजी देसाई यांनी ‘गोळी मारा…. मरेपर्यंत मारा…’ (शूट अ‍ॅट साईट… अ‍ॅण्ड शूट टू किल…) म्हणूनच अत्रेसाहेबांनी मोरारजी देसाईंना संतापून ‘नरराक्षस’ म्हटले. 106 हुतात्म्यांचे रक्त सांडले आहे. तो सगळा इतिहास ज्यांनी निर्माण केला त्या लढ्याचे मुख्य सेनापती आचार्य अत्रे हेच होते. त्यासाठी त्यांनी साहित्याची लेखणी मोडली. सहा वर्षे त्यांनी एकही नाटक लिहले नाही. (1955 ते 1961)
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाल्यावर आचार्य अत्रे यांच्यातला ‘नाटककर’ पुन्हा जागा झाला. आणि मग ‘तो मी नव्हेच…’, ‘डॉ. लागू’, ‘प्रितीसंगम’, अशी बहारदार नाटकं रंगभूमीवर आली. त्या आगोदरचे नाटककार अत्रे… ज्यांनी नाट्यभूमी जगवली. ‘साष्टांग नमस्कार’, ‘घराबाहेर,’ ‘उद्याचा संसार’,  ‘जग काय म्हणेल’, ‘मोरूची मावशी’, ‘पाणीग्रहण’ अशी महान नाटकं दिली. आणि त्याचवेळी खिशात पाच रुपयेही नसताना चित्रपटसृष्टीत उभे राहून ज्यांनी इतिहास घडवला…. ‘श्यामची आई’ या महान चित्रपटाला राष्ट्रपतींचे पहिले सुवर्णपदक अत्रेसाहेबांनी मिळवले. ही गोष्ट सोपी नव्हती.
त्यावर्षीच्या स्पर्धेसाठी तीन चित्रपटांची निवड झाली होती. त्यातला पहिला चित्रपट होता… बिमल रॉय दिग्दर्शित प्रख्यात चित्रपट ‘दो बिघा जमीन…’, दुसरा चित्रपट होता सोहराब मोदी दिग्दर्शित ‘झाँशीची रानी’ आणि तिसरा चित्रपट होता… आचार्य अत्रे दिग्दर्शित ‘श्यामची आई’…. सात राष्ट्रीय परिक्षकांत एकही मराठी परिक्षक नव्हता. तीन हिंदी, दोन बंगाली आणि दोन मध्ये एक उडीया… आणि एक परिक्षक मंडळाचे अध्यक्ष… तेही बिगर मराठी. आणि निवड झाली ती ‘श्यामची आई’ या चित्रपटाची. त्यावेळचे राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी सुवर्णपदक अत्रेसाहेबांच्या गळयात घातले…. मराठी माणसांचा तो सर्वोच्च सन्मान होता. पण संयुक्त महाराष्ट्राचा लढा सुरू झाल्याबरोबर अत्रेसाहेबांच्या अंगात छत्रपती शिवराय आणि राणाप्रताप यांचे सामर्थ्य प्राप्त झाले. दोन हातांत दोन दांडपट्टे घेवून एखाद्या योध्याने घोड्यावर मांड ठोकावी, त्या दिमाखात अत्रेसाहेब लेखणीची आग ओकत होते. आणि वाणीतून तोफगोळे सोडत होते. त्यामुळेच शिवाजी पार्कमधील एक-एक सभा लाखा लाखांची होत होती. एरव्ही श्रोत्यांना हसवून   शब्दांचा हास्यस्फोट करणारे अत्रेसाहेब, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात किती प्रखर आग ओकत होते….
‘अन्यायाने संतप्त झालेल्या तीन कोटी मराठी जनतेला वाघनखं फुटतील आणि द्विभाषिकाचा कोथळा बाहेर काढला जाईल..’ हे शिवाजी पार्कवरील सभेतील त्यांचे वाक्य राणाप्रतापाच्या टोकदार भाल्यासारखे छातीत आजही घुसल्यासारखे वाटते. ते अत्रेसाहेब समोर असे उभे राहतात. त्यांचा शब्द न शब्द आठवतो…. ते अग्रलेख आठवतात… आग ओकणारे आणि संयुक्त महाराष्ट्र झाल्यावर तेच अत्रेसाहेब… ‘आषाढस्य प्रथम दिवसे’…. ‘आम्ही  जिंकलो आम्ही हारलो’… ‘असा गंधर्व पुन्हा न होणे’…. असे नितांत सुंदर अग्रलेख लिहितात…
आज हे सगळे आठवते आहे… तो लढा आठवतो आहे. ते सगळे नेते आठवत आहेत… त्या लढ्यातील सगळे मोठे नेते पाहता आले… क्रांतीसिंह नाना पाटील यांना ‘मराठा’त घेऊन येता आले. अत्रेसाहेबांकडे येताना ते मला म्हणाले…. ‘अहो, ‘क्रांतीसिंह’ ही पदवी मला तुमच्या अत्रेसाहेबांनीच दिली…. ’ तुकडोजी महाराज मुंबई रुग्णालयात आजारी होते. अत्रेसाहेबांनी शुभेछांचा गुच्छ देवून माझ्यासारख्या छोट्या पत्रकाराला महाराजांना भेटण्याची संधी मिळाली. त्यांची अंत्ययात्रा कव्हर करायला अत्रेसाहेबांनी मला मोझरीला (अमरावती) महाराजांच्या आश्रमात पाठवले…. एखादा चित्रपट डोळ्यांसमोरून पुढे सरकावा, तशी आज अवस्था आहे. एवढ्याशा मेंदूत काय साठवायचे… आणि किती साठवायचे…. काय आठवायचेेे… आणि किती आठवायचे… काय लिहायचे आणि किती लिहायचे….
मनात विचार आला… अत्रेसाहेबांच्या पुण्यतिथीदिनी काय कार्यक्रम करता येईल?  भाषणात अत्रेसाहेब सांगता येतील… पण काहीतरी वेगळे करावे.. म्हणून एक विचार आला… संयुक्त महाराष्ट्रासाठी जी घराणी लढली त्याघराण्यातील आजच्या प्रतिनिधीला कार्यक्रमाला बोलावून त्यांचा एक छोटा सत्कार करावा…. हुतात्म्यांची प्रतिमा त्यांना भेट द्यावी… त्याच फ्रेममध्ये त्यांच्या घराण्याच्या नेत्याने जो त्याग आणि समर्पण भावना व्यक्त केली होती. तेही छायाचित्र असावे….  
 जेवढे आठवतील, जे येतील… त्यांना आमंत्रित करणार आहे… मी फाटका माणूस काय भेट देणार…. हुतात्मा स्मारकाची एक प्रतिमा आणि त्या प्रतिमेतच त्या लढाऊ नेत्यांचे फोटो…
या सर्व घराण्यांचा त्याग फार मोठा आहे. समर्पणाच्या भावनेने ही घराणी लढली आहेत. बापू लाड तर स्वातंत्र्यसैनिक होते. क्रांतिसिंह नाना पाटील यांचा स्वातंत्र्य चळवळीतील पत्री सरकारातला लढा ख्यातनाम आहे. सेनापती बापट यांना ‘सेनापती’ ही पदवी स्वातंत्य लढ्यातील ‘मुळशी सत्याग्रहा’ मुळेच मिळाली होती. या घराण्यांना महाराष्ट्र विसरल्यात जमा आहे. जो देश किंवा जे राज्य, आपल्या पूर्वसुरिंनी केलेला त्याग आणि त्यांचे समर्पण विसरतो ती कृतघ्नता ठरते. महाराष्ट्राने कृतघ्न होऊ नये. कृतज्ञा रहावे. जमेल तेवढी कृतज्ञाता जपावी, हीच या कार्यक्रमामागची भावना आहे.

Exit mobile version